धाटाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचेच प्रेरणास्थान आहेत. अखिल मानव जातीचे कल्याणकारी बहुजन प्रतिपालक विश्ववंद्य छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्म अठरापगड लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. सर्वच जातीधर्मातील बांधवांनाही शिवरायांबद्दल आदर आहे. अर्थातच याचा प्रत्यय शिवजयंतीनिमित्त शेणवई येथील शिवसंग्राम मित्रमंडळाच्यावतीने आयोजित भव्य शिवजयंती उत्सवादरम्यान आला. यानिमित्ताने रोह्यातून ढोल, ताशा, लेझीम पथक व वारकरी सांप्रदाय मंडळांनी सहभाग घेतलेल्या भव्य शोभायात्रेतून पाहावयास मिळाला. हा अभूतपूर्व शिवजन्मोत्सव सोहळा साऱ्या रोहेकरांबरोबर सबंध पंचक्रोशीने ‘‘याचि देही याचि डोळा’’ पाहिल्याने साऱ्यांचा आनंद गगनात मावेना असे चित्र पहावयास मिळाले.भव्यदिव्य अशा शोभायात्रेत शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, तरुणवर्ग, महिलावर्ग, ग्रामस्थांचा उत्साह शिवरायांना मानवंदना देणारा ठरला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, कोण आला रे कोण आला शिवनेरीचा वाघ आला, अशा दमदार सिंहगर्जनेने सारा परिसर दणाणून गेला. याठिकाणी शोभायात्रेत शिवरायांच्या वेषभूषेत अनंत शिंदे यांनी जगदंब ढोल पथक महाड यांच्या माध्यमातून जिवंत देखावा सादर केल्याचे पाहावयास मिळाले, तर विद्यार्थी व तरुणवर्गाची वेषभूषा या शोभायात्रेदरम्यान आकर्षण ठरली. या शोभायात्रेत इतिहास अभ्यासक, व्याख्याते सतीश देशमुख, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सचिव हेमंत देशमुख, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन गणेश मढवी, सदस्य जीवन देशमुख, समीर देशमुख यांसह शिवसंग्राम मित्रमंडळाचे अध्यक्षांबरोबर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुणवर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे पाहावयास मिळाले. शहरात साऱ्यांनीच भव्यदिव्य शोभायात्रा अनुभवली. रायगडावरुन पहाटे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणलेल्या पेटत्या मशालीचे जागोजागी स्वागत आणि औक्षण करण्यात आले, तर फटाक्यांची आतषबाजी आणि शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सारा परिसर या कार्यकर्त्यांकडून दणाणला जात असल्याचे दिसले. याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त होता. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता मंडळाच्या सर्वच तरुण कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले. (वार्ताहर)