Join us  

कुर्ला भागात कमी दाबाने पाणीपुरवठा; रात्रीही सार्वजनिक नळावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 5:22 AM

तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना, मुंबईतील विविध भागांत पाणीटंचाई आहे. कुर्ला पश्चिम येथील शांतीनगर, संभाजी चौक परिसरात पाणी कमी दाबाने येत आहे.

- खलील गिरकरमुंबई : तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना, मुंबईतील विविध भागांत पाणीटंचाई आहे. कुर्ला पश्चिम येथील शांतीनगर, संभाजी चौक परिसरात पाणी कमी दाबाने येत आहे. केवळ तळमजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना पाणी मिळत असून, वरच्या मजल्यावर राहणाºया नागरिकांना पाण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.या परिसरात असलेल्या सार्वजनिक नळावर रात्रभर पाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. पूर्वी सायंकाळी ७ वाजता येणारे पाणी आता १० वाजता येते, सकाळी लवकर जाते. पाण्याला दाब नसल्याने वरील मजल्यावर पाणी चढत नाही, खालून पाणी घेऊन वर चढावे लागते. त्यामुळे मोठी दमछाक होते.कुर्ला पश्चिम येथील तकिया वॉर्डच्या भागात गेले काही दिवस पाण्याची अडचण होती. मात्र, सध्या पुरेसे पाणी येत असल्याची माहिती स्थानिक नागरिक आसिफ हकीम यांनी दिली.कुर्ला पूर्वेकडील कुरैशनगर परिसरात उंच ठिकाणी असलेल्या झोपड्यांमध्ये पाणी पुरेसे मिळत नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मोटार लावायला परवानगी नसतानाही अपरिहार्यता म्हणून मोटार सुरू करून पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. या भागात रात्री १२ला येणारे पाणी पहाटेपर्यंत असते. मात्र, कुर्ला परिसरातील इतर भागांप्रमाणेच या भागातही पाण्याला पुरेसा दाब नसल्याने पाणी भरण्यात खूप वेळ लागत आहे. या भागात लोकसंख्या जास्त व येणारे पाणी तुलनेने अपुरे असल्याने, उन्हाळ्यात पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते. याविषयी स्थानिक रहिवाशी निलोफर खान म्हणाल्या, ‘पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी नेहमी ओढाताण होते. या भागातील नागरिकांची पाणी हीच सर्वात मोठी समस्या आहे,’ असे मत खान यांनी व्यक्त केले. पाण्याची समस्या कायमस्वरूपी उपाययोजना आखून सोडविण्याची मागणी खान यांनी केली.कुरैशनगरात विकतचे पाणीकुरैशनगरातील नागरिकांना अनेकदा वेळेवर पाणी येत नसल्याने व मिळत नसल्याने पाणी दुकानातून खरेदी करावे लागते. त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड पडतो. सध्या रमजान महिना सुरू असल्याने, इतर ठिकाणी सेहरीसाठी पहाटे उठावे लागते. मात्र, या भागातील नागरिकांना पाण्यासाठी जागावे लागते व नंतरच सेहरी करता येते.पाण्याला पुरेसा दाब नसल्याने पाणी केवळ तळमजल्यावर राहणाºया नागरिकांना मिळते. मोटार लावल्याशिवाय वरच्या मजल्यांवरील नागरिकांना पाणी मिळत नाही. पाण्याला जास्त दाब नसल्याने ही समस्या उद्भवत आहे. मात्र, मोटार लावायला परवानगी नसल्याने, खाली उतरून पाणी मिळवावे लागते. काही व्यक्ती मोटार परवानगीला बाजूला सारून खुलेआमपणे मोटार लावून पाणी घेतात.- गुणवंत दांगट, रहिवासी शांतीनगर

टॅग्स :पाणी