Join us

अ‍ॅडमिशनच्या बहाण्याने लूट

By admin | Updated: March 11, 2015 01:32 IST

गेल्या काही वर्षांतील शिक्षण संस्थांच्या वाढत्या आकड्यांमुळे नवी मुंबई शिक्षणाचे माहेरघर म्हणून उदयास आले आहे. आधुनिक

गेल्या काही वर्षांतील शिक्षण संस्थांच्या वाढत्या आकड्यांमुळे नवी मुंबई शिक्षणाचे माहेरघर म्हणून उदयास आले आहे. आधुनिक शहरानुसार विकसित झालेल्या नवी मुंबईवर देशभरातील पालकांचे लक्ष लागले आहे. या शहरात वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मोठे जाळे आहे. अनेक खासगी नामांकित संस्थांनी शहरात आपल्या महाविद्यालयांच्या शाखा सुरू केल्या आहेत. त्यामुळे विविध राज्यांतील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत आहेत. मात्र परराज्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत सर्रास फसवणूक होत असल्याचे काही घटनांमधून सिद्ध झाले आहे. यासाठी काही टोळ्यांनी नामांकित संस्थांमधील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अ‍ॅडमिशनचे रॅकेट सुरू केले आहे. गेल्याच महिन्यात नवी मुंबई गुन्हे शाखेने डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात चालत असलेल्या अ‍ॅडमिशन रॅकेटचा पर्दाफाश केला. या रॅकेटमध्ये अभिजित शेळके या व्यवस्थापनातील कर्मचाऱ्याचा समावेश होता. आपल्या साथीदारांच्या मदतीने तो अ‍ॅडमिशनसाठी आलेल्या पालकांकडून लाखो रुपये घेऊन अ‍ॅडमिशन न देता फसवणूक करायचा. अखेर त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने शेळके याच्यासह त्याच्या तीन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या.शेळके आणि टोळीने आतापर्यंत अ‍ॅडमिशनच्या नावाखाली ४० लाख रुपयांची वसुली केल्याचे अधिक तपासात उघड झाले. अशाच प्रकारे दोन पालकांना एक कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघांनादेखील गुन्हे शाखेने अटक केली. त्यांनी पुणे येथील भारती विद्यापीठात एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून फसवणूक केली. त्याचप्रमाणे नेरूळ येथील तेरणा महाविद्यालयातदेखील प्रवेशाच्या बहाण्याने अनेकांची करोडो रुपयांची फसवणूक झाली. वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाइलवर मेसेज पाठवून अथवा ओळखीच्या माध्यमातून हे सापळे रचले जातात. त्यानंतर विश्वास संपादन करून अ‍ॅडमिशनकरिता डोनेशनच्या नावाखाली मोठी रक्कम उकळली जाते. हा संपूर्ण व्यवहार पडद्याआड होत असल्याने याची कुठेही नोंद होत नाही. तसेच अ‍ॅडमिशनसाठी पैसे देणाऱ्यांकडून काळ्या पैशाचा वापर केला जात असल्याने तक्रार होण्याची शक्यता फारच कमी असते. त्याचा मोठा गैरफायदा या टोळ्यांकडून उचलला जात आहे. मुलाने शिकून कर्तृत्ववान बनावे यासाठी अनेकांना आपल्या आयुष्यभराची जमा पुंजी अ‍ॅडमिशनच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीत गमवावी लागली आहे. इतर गुन्ह्यांच्या तुलनेत अशा गुन्ह्यांचे प्रमाण कमी असले तरी त्या माध्यमातून होणारी फसवणूक मात्र कोट्यवधीमध्ये आहे. टोळ्यांचे थेट शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनापर्यंत धागेदोरे पोहोचले असल्याने पोलिसांनाही कारवाई करताना अडचणी येत आहेत. डी.वाय. पाटील प्रकरणात अटक केलेल्यांपैकी एकाने गावाकडे हॉटेल थाटून महागड्या गाड्यांची हौस भागवली होती. यावरून त्याने अनेकांना अ‍ॅडमिशनच्या बहाण्याने लाखोंचा गंडा घातल्याची शक्यता आहे.