लोकमत न्यूज नेटवर्क
कसारा : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यव्यापी लाँग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेने सुरू केला आहे.
हा मार्च शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर घाटनदेवी येथे मुक्कामी होता. रविवारी २० हजार कष्टकरी सकाळी साडेआठ वाजता घाटनदेवी ते कसारा घाटमार्गे लतीफवाडी हे १२ किलोमीटरचे अंतर पायी येत शहापूर तालुक्यात दाखल झाले. या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना, शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हा मार्च मुंबईकडे निघाला आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधानीमध्ये राज्यपाल भवनावर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे या आवाहनानुसार सुरू करण्यात येत असलेल्या महामुक्काम सत्याग्रहात सामील होण्यासाठी किसान सभेचा हा मार्च रविवारी दुपारी मुंबईला दाखल होणार आहे.
दरम्यान, सोमवारी आझाद मैदान येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभा होणार आहे. मोर्चेकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कसारा घाट उतरल्यावर आपापल्या वाहनात बसून मुंबईकडे निघाले. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. घाटातील वाहतुकीला, तसेच मोर्चेकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी महामार्गाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, उपविभागीय अधिकारी के. एस. वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी टॅपचे प्रभारी अधिकारी अमोल वालझाडे व त्यांचे कर्मचारी नियोजन करीत होते.