Join us  

मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळून पूर्वपदावर, कर्जतहून मुंबईच्या दिशेने वाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 3:32 PM

अंबरनाथ स्टेशनवर लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याची माहिती मिळते आहे.

मुंबई, दि. 19- मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.  कर्जत रेल्वे स्टेशनहून मुंबईच्या दिशेनं लोकल सेवा सुरू झाली आहे. अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर लोकलचा पेंटाग्राफ तुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.  अप मार्गावरील सीएसटीकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. तर कल्याण-कर्जत दरम्यानची रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली होती. शनिवारी दुपारी 2.45  वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता. रेल्वेच्या या खोळंब्यामुळे  अंबरनाथ-बदलापूर स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.  

त्यात शनिवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. सकाळी मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू होती. तसंच पावसामुळे भांडुप-कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनदरम्यान रूळावर पाणी साचले होते. याचाही रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. 

सहा प्रवासी झाले जखमी

अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्टेशनदरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटून झालेल्या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवाशांना कल्याणमधील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रवाशांची नावे सचिन घाग व विनय बडेकर अशी आहे. विनय हा विद्यार्थी असून सचिन हा डोंबिवलीतील एका खासगी कंपनीतील कर्मचारी आहे. विनयच्या हाताला तर सचिनच्या तोंडाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे जखमी प्रवाशांना बदलापूर रेल्वे स्थानकातच रोखून धरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सचिनचा मित्र देवीदास भगत यांनी सांगितले की, बदलापूर रेल्वे स्थानकात रुग्णवाहिका उभी असतानादेखील सचिन व विनय यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. घटनास्थळी रुग्णवाहिका 40 मिनिटे थांबवून ठेवण्यात आली होती. दोनच जखमी प्रवासी कसे नेणार अन्य प्रवाशांना जोपर्यंत आणले जात नाही. तोपर्यंत रुग्णवाहिका रुग्णालयात नेली जाणार नाही,  रेल्वे प्रशासनाची अशी चीड आणणरी वृत्ती समोर आल्याने अन्य प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळेच उपचारांसाठी तब्बल 40 मिनिटे उशीर झाला असल्याचा आरोपही भगत यांनी केला आहे.  

टॅग्स :मध्ये रेल्वे