Join us  

सर्वसामान्यांसाठी लोकल नव्या वर्षांतच सुरु होणार; इकबाल चहल यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 5:31 PM

Local for the general public : काही दिवस पर्यायी वाहतूकीने प्रवास करावा लागणार आहे.

 मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आता कोरोना परिस्थितीवर ब-यापैकी नियंत्रण मिळविल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला असला तरी देखील सुरक्षेच्या कारणात्सव मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी नव्या वर्षातच सुरु होणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीच लोकल सुरक्षेच्या कारणात्सव आता सुरु करणे योग्य नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितल्याने चाकरमान्यांना आणखी पुढील काही दिवस पर्यायी वाहतूकीने प्रवास करावा लागणार आहे.

कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल होत असतानाच कोरोनावरही ब-यापैकी नियंत्रण मिळविले जात आहे. परिणामी मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल १५ डिसेंबरनंतरच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची चिन्हे होती. मात्र याबाबतचा निर्णय कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच घेतला जाणार आहे. कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून चाचण्यांची संख्या वाढवण्यासोबतच रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तिंची चाचणी व पडताळणी सातत्याने करण्यात येत आहे. महापालिकेने केलेल्या उपाय योजनांमुळे दिल्लीच्या तुलनेत मुंबईने कोरोनावर ब-यापैकी नियंत्रण मिळविले आहे.

तत्पूर्वी गणेशोत्सवात नागरिक मोठया प्रमाणावर बाहेर पडल्याने कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणावर झाला होता. परिणामी दसरा आणि दिवाळीदरम्यान नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पालिकेने केले होते. दस-याला नागरिकांनी महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला देखील; मात्र दिवाळीदरम्यान नागरिक मोठया प्रमाणावर घराबाहेर पडले. परिणामी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी भीती व्यक्त केली गेली. यावर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने दिवाळीनंतर परराज्यातून मुंबईत दाखल होणा-या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या सुरु केल्या. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी इतर उपाय योजनाही हाती घेतल्या. याचा सकारात्मक परिणाम म्हणून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. 

टॅग्स :लोकलमुंबईमुंबई महानगरपालिका