मुंबई : जीवनविद्या मिशन या शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी संस्थेद्वारे सद्गुरू वामनराव पै यांच्या पत्नी मातृतुल्य शारदा माई यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त नुकताच तीन दिवसीय ज्ञानप्रबोधन महोत्सव साजरा करण्यात आला.१४, १५ आणि १६ एप्रिल दरम्यान हा महोत्सव पार पडला. जीवनविद्या मिशनतर्फे ‘अवयवदान’ हे अभियान यंदा राबविण्यात येत आहे. जीवनविद्या मिशन ही नेहमीच समाजाला उपयुक्त असे उपक्रम संस्थेच्या महोत्सवांमध्ये राबवीत असते. या अवयवदान अभियानांतर्गत डॉ. विद्याधर लाड व सांगलीचे प्रसिद्ध नेत्रचिकित्सक व जीवनविद्या मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन यांनी या महोत्सवामध्ये ‘अवयवदान’ या विषयाबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमामध्ये जीवनविद्या तत्त्वज्ञानाच्या मार्गदर्शक डॉ. विद्या जोशी यांनीदेखील ‘आरोग्य मनाचे’ या विषयावर मार्गदर्शन केले. अवयवदानासाठी नावनोंदणी करणाऱ्या लोकांनी त्यांच्या मृत्यूपश्चात हा निर्णय अमलात आणण्यासाठी प्रथम आपल्या नातेवाइकांना समजावून सांगावे व स्वत:च्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी, असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. शरीर प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी मन:स्थिती कशी उत्तम राखावी याबद्दल देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली. मानसिक स्थितीचा आपल्या शारीरिक स्थितीवर नकळत परिणाम होत असतो. त्यामुळे मनाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नये, असेदेखील या वेळी सांगण्यात आले. या महोत्सवात हजारो नामधारकांनी उत्स्फूूर्तपणे अवयवदानासाठी नावनोंदणी केली ही कौतुकास्पद आहे. या अभियानातून जनजागृती करून गरजूंना योग्य वेळी जीवनदान मिळावे हा संस्थेचा हेतू आहे.
जीवनविद्या मिशनचे अवयवदान अभियान
By admin | Updated: April 29, 2017 01:47 IST