मुंबई : ३ आॅगस्ट, २०१४ हा दिवस बैकर कुटुंबीयांसाठी काळा दिवस ठरला. या दिवशी करी रोड येथील रामदूत इमारतीमध्ये दहीहंडीच्या सराव शिबिरात राजेंद्र बैकर (३५) जबर जखमी झाले. त्यानंतर चार महिने शर्थीचे प्रयत्न करूनही १ नोव्हेंबर, २०१४ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधल्या काळात नेत्यांपासून अनेकांनी केवळ भेटीगाठी घेतल्या. पण आजमितीस फक्त मंडळ या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. या कुटुंबीयांना अजूनही शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे.बैकर यांच्या परिवारात पत्नी, ८ वर्षीय मुलगी, ६ वर्षांचा मुलगा आणि आई-वडील आहेत. अपघातानंतर राजेंद्र बैकर यांच्या उपचारांसाठी दीड ते दोन लाखांचा खर्च आला. मात्र या कठीण काळात बैकर कुटुंबीयांना कोणीच मदत केली नाही. या कुटुंबीयांच्या पाठीशी फक्त श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळ उभे राहिले. या घटनेला वर्ष उलटल्यानंतरही दर महिन्याला हे मंडळ बैकर कुटुंबीयांना आजही आर्थिक मदत करत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अंकुश गुरव यांनी सांगितले.कुटुंबातील कर्ता पुरुषच निघून गेल्याने त्यांच्या पत्नीने जगण्याची जिद्द सोडली नाही. आज त्या नोकरी करून परिवाराचा सांभाळ करीत आहेत. बैकर यांना मदत व्हावी यासाठी मंडळाने आयोजक, शासन आणि समितीशी बराच काळ पत्रव्यवहार केला. मात्र पदरी निराशाच पडल्याचे गुरव यांनी सांगितले. या घटनेच्या दु:खद स्मृती असल्या तरी उत्सवाची परंपरा टिकवण्यासाठी हे मंडळ उत्सवात सामील होत आहे. परंतु, आता उंचच उंच थरांचा मनोरा न रचता पारंपरिक उत्सव साजरा केला जातो.दहीहंडी उत्सवादरम्यान होणाऱ्या गोविंदांच्या अपघाताबद्दल मंडळाचे अध्यक्ष अंकुश गुरव यांना विचारले असता, धर्मादाय आयुक्तालयात नोंदणीकृत असणाऱ्या गोविंदा पथकांनाच उत्सवासाठी परवानगी दिली पाहिजे. त्यामुळे अपघातांच्या संख्येत खूप घट होईल, असे त्यांनी म्हटले. शिवाय, न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाची असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. दहीहंडी उत्सवात आयोजक केवळ खर्च दाखविण्यासाठी लाखोंच्या हंड्या लावतात. मात्र प्रत्यक्षात गोविंदा पथकांच्या पदरी निम्म्याहून कमी रक्कम येते, हे वास्तव मंडळाचे सचिव दिनेश परब यांनी अधोरेखित केले. शिवाय, दहीहंडी हा उत्सव आहे. तो उत्सवासारखाच साजरा केला पाहिजे. साहसी खेळ म्हणून याला मान्यता नको; यामुळे केवळ गोविंदा पथकांना संभ्रमात ठेवण्यात येणार आहे. उत्सवाचे व्यावसायिकीकरण चुकीचे नसून जितेंद्र आव्हाड यांनी रद्द केलेला उत्सव राजकारणच असल्याचा आरोप त्यांनी केला. गोविंदाची सुरक्षा आजही वाऱ्यावर आहे. याकडे आयोजक आणि शासनाने लक्ष दिले पाहिजे. एखाद्या गंभीर घटनेत त्या गोविंदाची आणि कुटुंबांची जबाबदारी घेण्यासाठी भक्कम यंत्रणा हवी. उत्सवाचे ‘इव्हेंटीकरण’ करताना सुरक्षाकवच किती मजबूत आहे, याचा विचार करणे महत्त्वाचे असल्याचे मत परब यांनी मांडले. (प्रतिनिधी)
जीव गेला, पण मदत मिळालीच नाही!
By admin | Updated: August 25, 2015 05:22 IST