Join us

अपयशातून शिकत गेलो - मधुर भंडारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 04:38 IST

करिअरच्या सुरुवातीलाच अपयश आले. पण मी खचून गेलो नाही. याउलट मी माझ्या आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहू लागलो. मेहनत करत गेलो

मुंबई : करिअरच्या सुरुवातीलाच अपयश आले. पण मी खचून गेलो नाही. याउलट मी माझ्या आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहू लागलो. मेहनत करत गेलो, त्यामुळे दिग्दर्शक म्हणून यश मिळाले. अपयशातूनच मी शिकत गेलो, असे प्रतिपादन दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी केले. आयआयटी बॉम्बे येथे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा हेदेखील या चर्चासत्रात सहभागी झाले होते.भंडारकर म्हणाले की, मी दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला. त्यामुळे खचलो नाही. सचिन तेंडुलकरदेखील पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर त्याने घडवलेला इतिहास सर्वश्रुत आहे. यातून मला प्रेरणा मिळाली. मी अधिक जोमाने काम करत गेलो, त्यामुळे यश मिळत गेले.राकेश मेहरा म्हणाले की, मला ‘रंग दे बसंती’ चित्रपट करत असताना फक्त एकच गोष्ट दाखवायचीहोती की, भारतातील तरुणवर्गामध्ये देशासाठी काही तरी चांगले, सकारात्मक करून दाखवण्याची ऊर्मी आहे. त्यांच्यामध्ये देशात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची जबरदस्त क्षमता आहे.‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमाविषयी बोलताना ते म्हणाले की, सिनेमा पाहून मिल्खा सिंग मला म्हणाले की, ‘माझ्या मनातला भारत-पाक फाळणीबाबतचा जो राग होता, तो या सिनेमामुळे आता मावळला आहे.’ हा सिनेमा हिट झाला यापेक्षाही मला मिळालेली ही प्रतिक्रिया खूप मोठी वाटते.