मुंबई : नेहमीच वाहतुकीच्या वर्दळीने गजबलेल्या लाल बहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस) व स्वामी विवेकानंद (एसव्ही) मार्गाची कोंडी अखेर सुटणार आहे़ या प्रमुख मार्गावरील वाहतुकीला अतिक्रमणाचा फटका बसत असल्याने, येथील बेकायदा बांधकामे तत्काळ हटविण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी एका विशेष बैठकीत उपायुक्तांना दिले आहेत़पूर्व व पश्चिम उपनगराला जोडणारे दोन प्रमुख मार्ग म्हणजे एलबीएस आणि एस.व्ही. रोड शीव पश्चिमपासून सुरू होऊन मुलुंडपर्यंत जाणारा एलबीएस मार्ग पूर्व उपनगराला जोडतो़, तर वांद्रे पश्चिम येथून सुरू होऊन दहिसरपर्यंत जाणारा एस़व्ही़मार्ग़ पश्चिम उपनगरला जोडतो़ मात्र, या प्रमुख मार्गांवर गेल्या काही वर्षांमध्ये बेकायदा बांधकाम व अतिक्रमणे तयार झाली़ परिणामी, सर्वाधिक वाहतूककोंडी या मार्गांवर होत आहे़पावसाळ्यात या मार्गांवरील वाहतूक जवळपास ठप्पच होते़ यावर तोडगा काढण्यासाठी पालिका आयुक्तांनी विशेष बैठक बोलाविली होती़ या बैठकीत सर्व परिमंडळाचे उपायुक्त हजर होते़ आढावा घेतल्यानंतर आयुक्तांनी एलबीएस मार्ग व एसव्ही मार्गाबरोबरच रस्त्यावरील अतिक्रमणे तत्काळ हटविण्याचे आदेश उपायुक्तांना दिले़ यासाठी पोलीस बंदोबस्तही आवश्यकतेनुसार घेण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
एलबीएस व एसव्ही मार्गावरील कोंडी फुटणार
By admin | Updated: June 19, 2016 02:34 IST