Join us

न्यायाधीशांसमोरच वकीलच एकमेकांना भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:24 IST

नितीन पंडितलोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : एका खटल्याची सुनावणी सुरू असताना आरोपी व फिर्यादीचे दोन्ही वकील आपली बाजू ...

नितीन पंडित

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : एका खटल्याची सुनावणी सुरू असताना आरोपी व फिर्यादीचे दोन्ही वकील आपली बाजू मांडत असताना वकिलांचा युक्तिवाद चक्क हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी भिवंडी न्यायालयात घडली आहे. विशेष म्हणजे न्यायाधीशांसमोरच दोघे वकील आपल्या अशिलांची बाजू बाजूला ठेवून चक्क एकमेकांनाच भिडले. या मारहाणप्रकरणी वकिलाने शांतीनगर पोलीस ठाण्यात वकिलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर ही घटना पत्रकाराला माहिती पडताच या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारालादेखील वकिलाने मारहाण करीत धमकी दिली असल्याने पत्रकारानेदेखील या वकिलाविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नारपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खटल्याची सुनावणी रविवारी दुपारी सुरू होती. मात्र, आपली बाजू मांडतांना ॲडव्होकेट शैलेश गायकवाड आणि ॲडव्होकेट अमोल कांबळे यांच्यात भिवंडी न्यायालयातच वाद झाला. वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी दोन्ही वकिलांना शांतीनगर पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, ॲड. अमोल कांबळे याने ॲड. शैलेश गायकवाड याच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

घटनेची माहिती पत्रकारांना मिळताच याबाबत वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांनी पोलीस ठाणे गाठले. या दरम्यान ॲडव्होकेट शैलेश गायकवाड हा पोलीस ठाण्यात उभा होता. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांकडून घेत असताना एबीपी माझाचे पत्रकार अनिल वर्मा घेत असतांना या गोष्टीचा राग ॲड. शैलेश गायकवाड यास आल्याने त्याने वर्मा यास शिवीगाळ केली. बातमी लावली तर तुला बघून घेईन, असे धमकावत पोलीस ठाण्यासमोरच मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्ही दिलेल्या बातम्या तू लावत नाही आणि आमची बातमी कशी लावतो तेच बघतो, अशी धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या या प्रकरणात पत्रकार अनिल वर्मा यांच्याकडून वकिलाविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. तर न्यायाधीशांसमोर व पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोर वकील व पत्रकारांना मारहाण होत असल्याने नागरिकांना कायद्याचा धाक राहिला की नाही असा प्रश्नदेखील यानिमित्ताने उभा राहिला असून, भिवंडीतील पत्रकारांनी या दुर्दैवी घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.