Join us  

गेल्या तीन वर्षांपासून मुंबई ‘जैसे-थे’च

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 6:22 AM

या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईत जागोजागी पाणी साठल्याने व रेल्वे सेवा ठप्प झाल्याने मुंबईकरांचे हाल झाले. याची दखल घेत उच्च न्यायालयाने गेली तीन वर्षे मुंबईची स्थिती ‘जैसे-थे’ असल्याचे म्हणत महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

मुंबई - या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईत जागोजागी पाणी साठल्याने व रेल्वे सेवा ठप्प झाल्याने मुंबईकरांचे हाल झाले. याची दखल घेत उच्च न्यायालयाने गेली तीन वर्षे मुंबईची स्थिती ‘जैसे-थे’ असल्याचे म्हणत महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.गेली तीन वर्षे मुंबईची स्थिती तशीच आहे. पावसामध्ये पाणी तुंबणे, गटार तुंबणे, रेल्वेसेवा ठप्प होणे या मुंबईच्या स्थितीत काहीही बदल झाला नाही, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने अंधेरी येथे दुसरे डॉप्लर रडार बसविण्यासाठी हवामान विभागाला १८ महिन्यांची मुदत दिली.गेल्या वर्षीच्या पावसात मुंबई तुंबली व रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली. अनेक लोक अडकले व कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. वेधशाळेने अचूक अंदाज न दिल्याने मुंबईकरांवर ही स्थिती ओढावली. त्यामुळे हवामान विभागाला मुंबई उपनरात दुसरे डॉप्लर रडार बसविण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले अटल दुबेल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.त्यावर न्यायालयाने म्हटले की, २०१५मध्ये ही यचिका दाखल करण्यात आली; पण या तीन वर्षांत मुंबईची स्थिती बदलली नाही. पाणी तुंबणे, रेल्वेसेवा ठप्प होणे हे नित्याचेच झाले आहे.मानखुर्द-सीएसटीदरम्यान रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या गटारामध्ये कचरा साठून पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी येत असल्याने येथील रेल्वे सेवा ठप्प होते. त्यामुळे येथील कचरा साफ करण्यासाठी निविदा काढण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने वर्षभरापूर्वी महापालिकेला दिले होते. या आदेशाची कितपत अंमलबजावणी करण्यात आली, अशी विचारणा महापालिकेकडे करीत न्यायालयाने याबाबत महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :न्यायालयबातम्या