मुंबई : राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात २ फेब्रुवारी रोजी ४१ हजार ५८६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू होते तर बुधवारी यात चार हजारांनी घट झाल्याचे दिसून आले. राज्यात बुधवारी ३७ हजार ५१६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात दिवसभरात ७ हजार ३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १९ लाख ४३ हजार ३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५८ टक्के झाले आहे. राज्यात बुधवारी २ हजार ९९२ रुग्ण आणि ३० मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २० लाख ३३ हजार २६६ झाली आहे, तर मृतांचा आकडा ५१ हजार १६९ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ३० मृत्यूंपैकी १८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ३० मृत्यूंमध्ये मुंबई ७, नवी मुंबई मनपा २, नाशिक मनपा १, अहमदनगर मनपा १, पुणे ५, पुणे मनपा १, सातारा २, औरंगाबाद मनपा १, बीड १, अमरावती मनपा १, वाशिम २, नागपूर २, नागपूर मनपा २, नंदुरबार २ या रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४७ लाख ६४ हजार ७४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.७७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
चौकट
कालावधी सक्रिय रुग्णसंख्या
३ फेब्रुवारी ३७ हजार ५१६
२ फेब्रुवारी ४१ हजार ५८६
१ फेब्रुवारी ४३ हजार ७०१
३१ जानेवारी ४५ हजार ७१