अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील चोण गावानजीक काही बड्या कंपन्यांनी एकत्रित येऊन या परिसरात विशेष नगर वसाहत वसविण्याचा घाट रचला असून त्यासाठी लागणा-या जागेकरिता भूखंड घोटाळा केला गेला आहे. याच कंपनीने फसवणूक करुन ज्या शेतकऱ्याची ८ एकर जागा बळकावली आहे, त्या शेतकऱ्याने या कंपनीविरोधात लढा सुरु केला आहे. या कंपनीने जी जी चुकीची कामे केली आहेत त्याचा लेखाजोखा आपल्या तक्रारीद्वारे मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाकडे सादर केला आहे. बदलापूर गावात राहणारे सुहास घाटवळ यांची वडिलोपार्जित शेतजमीन चोण गावात होती. वडिलांच्या निधनानंतर या सर्व जागेवर वारस म्हणून केवळ आईचेच नाव लागले. मात्र सुहास यांच्या वाट्याला ८ एकर जागा आली. सुहास यांच्या आईने उर्वरित काही जागा भवानजी छेडा यांच्याशी विक्रीचा व्यवहार करुन विकली. हा व्यवहार होत असतांना छेडा यांनी सुहास यांच्या वाट्याला आलेल्या ८ एकर जागेसह हा व्यवहार केला. मात्र छेडा यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी ही ८ एकर जागा सुहास यांना परत देण्याची तयारी दाखवली. मात्र त्याच दरम्यान छेडा यांचे निधन झाल्याने कागदोपत्री सुहास यांना जागा मिळाली नाही. नंतर या जागेसह चोण गावाच्या परिसरातील बहुसंख्य जागा चार बड्या कंपन्यांनी एकत्रित येऊन विकत घेतली. त्यात पुन्हा सुहास यांची जागा गेली. ही जागा परत मिळविण्यासाठी त्यांनी कंपनीकडे दाद मागितली. मात्र पदरी निराशाच आली. विशेष नगर वसाहतीसाठी १०० एकर जागा गरजेची असल्याने त्या अनुषंगाने संबंधित कंपनीने काही फॉरेस्ट लागलेली (वने) जागा आणि सुहास यांची ८ एकर जागा अशी एकत्रित जागा दाखवून ती परवानगी घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कंपनीच्या नावे जागा विकत घेताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे गरजेचे असतानाही या कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतलेली नाही, असा खुलासा शेतकरी सुहास घाटवळ यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
विशेष नगर वसाहतीच्या नावावर भूखंडा घोटाळा?
By admin | Updated: September 8, 2014 00:44 IST