नवी मुंबई : अविवाहित असल्याचे खोटे सांगून चार महिलांसोबत लग्न करणारा भामटा खारघर पोलिसांच्या अटकेत आला. बुधवारी न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. अशोक कुमार नायर ऊर्फ फिरोज मोहमद अली (42) असे त्याचे नाव असून तो बोरिवली येथील रहिवासी आहे.
खारघरमधील एका 38 वर्षीय विधवा महिलेने दोन वर्षापूर्वी लग्नासाठी आपली माहिती मॅरेज डॉट कॉम या वेबसाइटवर टाकली होती. साइटवरील माहिती पाहून बोरीवली मुंबई येथे राहणारा अशोककुमार याने संबंधित पीडित महिलेशी ओळख केली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर तिच्याशी विवाह करण्याची त्याने तयारी दर्शविली. आपली सर्व माहिती लपवून खोटा दस्तावेज तयार करून तिच्याबरोबर वांद्रे येथील न्यायालयात लग्न करून हे दोघेही खारघर येथे राहू लागले. दरम्यान, सदर महिला गरोदर राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास त्याने भाग पाडले. व्यवसायात नुकसान झाल्याचे सांगून पीडित महिलेकडे 6 लाख रुपयांची मागणी केली, तर महिलेने कर्जाने सहा लाख काढून ती रक्कम नायर याला दिली. कर्जाच्या पैशाची मागणी केल्यावर उलट तिला मारहाण करण्यास सुरु वात केली. त्यात तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि या झटापटीत तिचे 8क् हजार रुपयांचे दागिने घेऊन तो फरार झाला.
ऑगस्ट महिन्यात खारघर पोलीस ठाण्यात या महिलेने तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विकास साळवी यांनी तपास सुरू केला. मंगळवारी बोरीवली येथील बँक ऑफ बडोदा येथे नायर हे येणार असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला पकडून खारघर पोलीस ठाण्यात हजर केले. (प्रतिनिधी)
च्अशोक नायर याचे खरे नाव फिरोज मोहम्मद अली असे असून पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. फिरोज हा मुंबईबाहेर व्यवसाय असल्याचे सांगून खोटी माहिती देत असे. त्याने अशोक नायर या नावाने बनावट पँनकार्ड बनवून अविवाहित असल्याचे सांगून लग्न केल्याचे दिसून येते, तर विदेशात युके येथे एका नर्सबरोबर लग्न केल्याचे तपासात निष्पन झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले, नायर आडनाव वापरून त्याने अजून काही महिलांशी लग्न केल्याचा संशय असून त्याचा तपास सुरू आहे.