अजय महाडिक , मुंबईस्थानिक स्वराज्य संस्थेचे ग्रामपंचायत हा मुलभूत पाया असला तरी सांसदिय नियम परंपरे प्रमाणेच हा कारभार होत असतो. मात्र जर तसे होत नसेल तर त्याला मनमानी म्हणावे लागेल. असाच प्रकार सध्या भिवंडी तालुक्यातील लाखिवली, पालिवली व धामणे गृप ग्रामपंचायतीमध्ये पहायला मिळत आहे. एैशी टक्के आदिवासी लोकसंख्या असणाऱ्या या भागातील लोकप्रतिनीधी सुशिक्षित नसल्याने महसुली कारभार हाकणाऱ्यांनीच मोठा भ्रष्ट्राचार करून ग्रामसभेची दिशाभूल केल्याची तक्रार येथील उपसरपंच संतोष गुळवी यांनी कोकण विभागिय आयुक्तांकडे केली आहे.ग्रामपंचायत कार्यालयातील प्रोसिडिंग बूक महिनोनमहिने न भरुन आपल्या सोई प्रमाणे तिचे लेखन केल्याचे पुरावेच लोकमतच्या हाती आले आहेत. यासर्व प्रकारात संगनमताने ८,४७,४०६ लाखांचा भ्रष्ट्राचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यात एप्रिल २०१५ मध्ये १७ हजार रुपये गटविकास अधिकाऱ्यांना दिल्याचे मासिक सभेत दिसत असल्याने त्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तसेच मासिक सभा खर्च, सादील रक्कम, नोकर पगार, शौचालय उभारणी, वाण्याचा पाडा व लाखिवली रस्ता बांधणीत दाखविलेला खर्च व प्रत्यक्ष काम यात मोठी तफावत दिसून येत आहे. याप्रकरणी उप अभियंते गिते यांना तक्रार करण्यात आली होती. गावाजवळील स्मशानभूमीसाठी डिसेंबर २०१४ ते सप्टेबर २०१५ या काळात ग्रामपंचायतीच्या भारतीय स्टेट बॅँकेच्या खात्यातून ५४ हजार रुपये काढण्यात आले. मात्र याकाळात स्मशानभूमीसाठी कोणतेही काम करण्यात आलेले नाही. तसेच याच खात्यावरुन आॅगस्ट २०१५ मध्ये ३१,८२५ रुपये काढले असून त्या संदर्भात ग्रामविकास अधिकाऱ्याला विचारले असता ते निरुत्तर राहिले. सरपंच सरीता भोईर यांनी लोकमतचे प्रस्तूत प्रतिनिधी उपस्थित असतांना ग्रामसेवक किरण तेले यांच्याकडे कॅशबूकची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन ते निघून गेले. तर सरपंचानीं त्यांना अकांऊटचे ज्ञान नसल्याचे सांगून सर्व कारभार ग्रामसेवकच पाहतात असे सांगितले.
लाखिवली ग्रुप ग्रा.पं.मध्ये गैरव्यवहार?
By admin | Updated: November 23, 2015 01:11 IST