अमोल पाटील, खालापूर - खोपोली शहर परिवहन सेवेमुळे प्रवाशांना बसणारा आर्थिक भुर्दंडाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालिकेने परिवहन सेवेचे खाजगीकरण केल्यानंतर प्रवाशांना मिळणार्या सुविधांमध्ये वाढ न होता कपात झाल्याने सुस्थितीत चालणार्या परिवहन सेवेच्या कारभारावर प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. विद्यार्थी, कामगार यांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याने पालिका प्रशासनाने प्रवाशांच्या मागणीवर तातडीने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे . श्रीमंत नगर पालिका म्हणून खोपोली पालिकेची सर्वत्र ख्याती असताना स्वर्गीय नगराध्यक्ष गोवर्धन तन्ना यांच्या अथक परिश्रमातून काही दशकांपूर्वी खोपोली नगर पालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरु केली. एका नगर पालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरु केल्याने सर्वत्र या भूमिकेचे कौतुक करण्यात येत होते. दरम्यानच्या काळात परिवहन सेवेवर होणारा खर्च हा उत्पन्नापेक्षा अधिक असल्याने परिवहन सेवा पांढरा हत्ती बनत चालल्याने अखेर अलीकडील मागील वर्षी पालिकेने परिवहन सेवेचे खाजगीकरण केले . परिवहन सेवेचे खाजगीकरण केल्याने आता ही सेवा नवी मुंबई, पनवेल, लोणावळा तर खालापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील मिरकुट वाडी, देवन्हावे, आडोशी, खालापूर अशा ठिकाणी सुरु झाल्याने त्याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना नक्कीच झाला आहे . त्यातच पूर्वी पेक्षा धावणार्या बसेसची संख्या वाढल्याने दळणवळण सोपे झाले आहे. नवी मुंबई, वाशी, पनवेल तर लोणावळा या ठिकाणी जाणारे विद्यार्थी, कामगार यांना याचा लाभ झाला आहे. खोपोली शहरातील विद्यार्थी, कामगार यांचे येणे-जाणे सुलभ होत असताना विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात मिळणारा मासिक पास तर कामगार यांना मिळणारे मासिक आणि त्रैमासिक पास खाजगीकरणानंतर बंद झाले आहेत . सवलतीचे पास बंद झाल्याने प्रवासादरम्यान कामगार वर्गाला याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे .
केएमटीच्या खाजगीकरणाचा फटका
By admin | Updated: May 19, 2014 04:45 IST