Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : टोलनाक्यांवर वसुली ‘टाईट’

By admin | Updated: September 19, 2014 00:29 IST

अरेरावी वाढली : वादावादीचे प्रकार; निवडणुकीच्या तोंडावर तणावाची शक्यता

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून शहरातील सर्वच टोलनाक्यांवर वसुलीसाठी आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी ‘जोर’ लावला आहे. वसुलीसाठी वाहनधारकांची अडवणूक केली जात आहे. नाक्यांवरील कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढल्याने टोल देण्यावरून वादावादीचे प्रसंग घडत आहेत. वेळीच या उर्मट कर्मचाऱ्यांवर नियंत्रण न ठेवल्यास निवडणुकीच्या तोंडावर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.शाहू टोलनाक्यावर आज, गुरुवारी दुपारी एका वाहनधारकाने टोल न देण्याची भूमिका घेतली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनीही टोल दिल्याशिवाय गाडी सोडणार नाही, असे वाहनधारकाला बजावले. वाहनधारक व कर्मचाऱ्यांत जोरदार वादावादी झाली. ‘टोल देणार नाही आणि गाडी येथून हलविणार नाही,’ अशी भूमिका वाहनधारकाने घेतल्याने या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यानंतर वाहनधारक आपल्या गाडीतून उतरताच कर्मचाऱ्यांनी पुन्हा वाद घातला. उपस्थित इतर वाहनधारकांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला. असे प्रकार शिरोली, शिये व इतर सर्वच टोलनाक्यांवर सुरू झाल्याने निवडणुकीच्या तोंडावर टोलचा वाद पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. पोलिसांची डोकेदुखी वाढणारटोलनाक्यांवर कोल्हापूर पासिंग असणाऱ्या वाहनधारकांना टोलसाठी फक्त विनंती केली जात असे. ‘टोल देणार नाही’ असे ठणकावून सांगताच कर्मचारी वाहनांना सोडत होते. गेले पाच महिने सर्वच नाक्यांवर हे चित्र होते. त्यास ‘आयआरबी’ने फाटा देण्याचा प्रयत्न केल्याने नाक्यांवरील वादावादीच्या प्रसंगांत वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. नाक्यावर टोलसाठी वादावादीचे प्रसंग नित्याचे झाल्याने याचा परिणाम के.एम.टी. व एस.टी. बसेसवर होत आहे. नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचे वेळेचे नियोजन कोलमडत आहे. ंकर्मचाऱ्यांंवर दबाव कोेल्हापूरकरांनी टोल न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातून लाख-दीड लाख रुपयांपेक्षा जादा वसुली होत नाही. ‘आयआरबी’चे अधिकारी टोलवसुलीसाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणत आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कोणीही राजकीय नेते किंवा पुढारी नाक्यावर येणार नाहीत, याची खात्री झाल्यानेच ‘आयआरबी’ने टोलवसुलीचा रेटा वाढविल्याची चर्चा आहे. परिणामी ‘टोल देणार नाही’ म्हटल्यावर जोरदार खडाखडी होत आहे. इंधनाचा अपव्ययटोलनाक्यावरून किती वेळात गाडी रवाना होणार याचे नियोजन करण्याची पद्धत आहे. नाक्यावर पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ वाहनधारकास प्रतीक्षा करावयास लागू नये, असा नियम आहे. मात्र नाक्यांवरील वाहने अर्धा तास ताटकळत थांंबल्याने वेळेसह इंधनाचा अपव्यय होत आहे.