Join us  

खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे राज्यातील ३५ जिल्ह्यात खादी महोत्सवाचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 5:34 AM

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यात ३५ जिल्ह्यात खादी महोत्सवाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुंबई : खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यात ३५ जिल्ह्यात खादी महोत्सवाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. महाखादी प्रोत्साहन व विक्री केंद्र-पुणे च्या धर्तीवर राज्यात विभागीय स्तरावर अशी सहा केंद्रे सुरु करण्यात येतील. विमानतळावर खादी ग्रामोद्योग मंडळाचे भव्य दालन सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठविण्यात येणार आहे. राज्यात ग्रामोद्योगाला चालना मिळावी, त्यातून स्थानिकांना रोजगार मिळताना गावे सक्षम आणि स्वावलंबी व्हावीत यासाठी कौशल्य विकास विभागाच्या सहकार्यातून ग्रामोद्योगाची निवड करून त्याचे जिल्हानिहाय क्लस्टर करण्यात येतील.राज्य शासनाने महात्मा गांधीजींचे दीर्घकाळ वास्तव्य असलेल्या सेवाग्राम विकास आराखड्यास मंजुरी दिली असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.‘गांधी फॉर टुमारो’ अंतर्गत महात्मा गांधी संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येईल. शासकीय तंत्रनिकेतन वर्धा आणि ग्राम सेवा मंडळ वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या धोरणानुसार सहा महिन्याचा अभ्यासक्रम खादी ग्रामोद्योग मध्ये सुरु करण्यात येईल. याशिवाय रॅली, परिसंवाद, चर्चासत्रे, शिबीरे आयोजित करून गांधीजींचा विचार देशभरातील भारतीयांच्या मनात रुजवला जाईल. असेही ते म्हणाले.