मुंबई : देशभरात पत्रकारांना धमक्या देऊन त्यांच्या हत्या करण्यात येत असल्याने माध्यमांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनांचा निषेध व्यक्त करत देशातील सर्व पत्रकार संघटना एकत्र आल्या असून देशपातळीवर गांधी जयंतीनिमित्त सोमवारी सायंकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान एकाच वेळी आंदोलन केले जाणार आहे.गेल्या महिन्याभरात कर्नाटक येथील पत्रकार गौरी लंकेश, त्रिपुरामधील पत्रकार शांतनू भौमिक आणि नंतर पंजाबच्या मोहाली येथील निवृत्त पत्रकार के.जे. सिंह यांच्या क्रूर हत्यांमुळे लोकशाहीचा चौथा स्तंभच धोक्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पत्रकारांचा खून केलेल्या मारेकºयांना शोधण्यात पोलीस प्रशासन सातत्याने अपयशी ठरल्याचे दिसत आहे. यासोबतच १००हून अधिक पत्रकारांना धमकावण्यात येत आहे. त्यात वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, रविश कुमार यांसह विविध पत्रकारांचा समावेश आहे. पत्रकारांची बदनामी करण्यासाठी आणि धमक्या देण्यास सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे. ऐक्य दिनानिमित्त सर्व पत्रकार संघटना देशभरात एकाच वेळी निषेध सभा घेणार आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि मुंबई प्रेस क्लब यांनी संयुक्त विद्यमाने प्रेस क्लबच्या सभागृहात निषेध सभेचे आयोजन केले आहे. या सभेस मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष कुमार केतकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, लेखिका शोभा डे, आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, लेखिका प्रज्ञा पवार हे प्रमुख वक्ते असतील.
पत्रकार संघटनांचा आज देशभरात ‘ऐक्य दिन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:59 IST