Join us

पत्रकाराने क्रियाशील असावे - पॅट्रिशिया मुखिम

By admin | Updated: December 30, 2014 01:39 IST

आपण जेव्हा एखाद्या गोष्टीच्या विरोधात जाऊन काम करतो, अन्यायाविरुद्ध बंड पुकारतो तेव्हा ते रस्ते फार खडतर असतात.

मुंबई: आपण जेव्हा एखाद्या गोष्टीच्या विरोधात जाऊन काम करतो, अन्यायाविरुद्ध बंड पुकारतो तेव्हा ते रस्ते फार खडतर असतात. अशा वेळेस आपल्या या कामाचा गौरव जेव्हा होतो त्यावेळेस फार आनंद होत असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री पॅट्रिशिया मुखिम यांनी व्यक्त केले आहे़पॅट्रिशिया यांना ‘माय होम इंडिया’तर्फे वन इंडिया अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा दादर पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या, पत्रकाराने क्रियाशील असावे, आपल्या कामासाठी पेटून उठले पाहिजे़मेघालयात ‘कॉँग पॅट’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या पॅट्रिशिया यांनी तेथील दहशतवादाविरोधात लढा दिला. व्यसनमुक्तीसाठीही त्यांनी विपुल लेखन केले आहे. मेघालयाच्या कल्याणासाठी आणि दहशतवाद संपवण्यासाठी अनेक प्रकारे काम केले आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना ‘वन इंडिया अवॉर्डने गौरविण्यात आल्याचे माय होम इंडियाचे संयोजक सुनिल देवधर यांनी सांगितले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री किरण रिजीजू उपस्थित होते. ‘उत्तर पूर्व भारतात अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार कमी आहे. हे दुर्दैवच आहे.’ अशी खंत किरण यांनी व्यक्त केली.‘अनेक लोकांना, संस्थांना मी भेटतो. त्यावेळेस ते दिल्ली अजून खूप दूर आहे. तेथे आम्हाला कोण मदत करणार? असे प्रश्न ते विचारतात. मात्र मी असे मानतो की, देशाच्या सीमारेषांनी देश बनतो, त्याच्या राजधानीने नव्हे. तुम्ही समृद्ध बनाल व आपल्या समस्यांविषयी आवाज उठवाल तरच लोकं तुमचे ऐकतील’, असेही रिजीजू म्हणाले. (प्रतिनिधी)