Join us

जेएनपीटी विरोधात आंदोलन छेडणार !

By admin | Updated: May 18, 2015 22:40 IST

जेएनपीटीने प्रकल्पग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना हरताळ फासून चौथ्या बंदराचे कामकाज सुरू केले आहे.

उरण : जेएनपीटीने प्रकल्पग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना हरताळ फासून चौथ्या बंदराचे कामकाज सुरू केले आहे. साडेबारा टक्के भूखंड वाटप, रस्त्यांचे नियोजन झाल्याखेरीज सुरू केलेले चौथ्या बंदराचे कामकाज बंद करावे, अन्यथा जेएनपीटी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी जेएनपीटीला दिला आहे.जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या मागील २८ वर्षांपासूनच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने साडेबारा टक्के भूखंड वाटप, स्थानिकांच्या रोजगार, नोकऱ्यांचा आणि रहदारी आदी प्रश्नांचा समावेश आहे. साडेबारा टक्के भूखंड वाटपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना इरादा पत्रांचेही वाटप झाले आहे. मात्र त्यानंतरही भूखंडाच्या वाटपाबाबत अंमलबजावणी झालेली नाही. त्याचप्रमाणे जेएनपीटीच्या रस्त्यांच्या नियोजनाअभावी शेकडो अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये हजारो निष्पापांचे मृत्यू झाले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित असताना जेएनपीटीने चौथ्या बंदराचे काम सुरू केले आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी असून चौथ्या बंदराचे सुुरू केलेले काम बंद करावे, अन्यथा प्रकल्पग्रस्त व स्थानिक जनता उरण उत्कर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जेएनपीटी विरोधात जाहीर निषेध, निदर्शने, उपोषण, रास्ता रोको आणि न्यायालयात दाद मागण्यासारख्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील,असा इशारा उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी जेएनपीटी अध्यक्षांना दिला आहे. (वार्ताहर)