Join us  

जुहू सिल्व्हर बीचवर मोठ्या प्रमाणात आले ऑइल टार बॉल व जेलीफिश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 10:20 AM

जुहू सिल्व्हर बीचवर समुद्राच्या भरतीमध्ये ऑइल टार बॉल मोठ्या प्रमाणात सोमवारी सकाळी वाहून आले आहेत.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : जुहू सिल्व्हर बीचवर समुद्राच्या भरतीमध्ये ऑइल टार बॉल (ऑईलच्या गुठळ्या) मोठ्या प्रमाणात सोमवारी (13 ऑगस्ट) सकाळी वाहून आले आहेत. तसेच जेलीफिश देखील आले आहेत. सुमारे 4.5 किमीच्या जुहू बीच व जुहू सिल्व्हर बीच हा अस्वच्छ झाला आहे. गेल्या 1 ऑगस्टपासून येथे जेलीफिशची दहशत सुरूच आहे.

सोमवारी दुपारी 1.24 मिनिटांनी 4.91 मीटरची मोठी हायटाईड असल्याने मोठ्याप्रमाणात टार बॉल व जेली फिश आणि प्लास्टिक येथील समुद्र किनाऱ्यावर वाहून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी समुद्राच्या पाण्यात उतरू नये असे आवाहन सी गार्डीयन लाईफ गार्ड असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कनोजिया यांनी लोकमत ऑनलाईनच्या माध्यमातून नागरिकांना केले आहे. गेली 10 वर्षे रोज सकाळी 6.30 वाजता जुहू सिल्व्हर बीचवर येऊन  या बीचची स्थिती काय आहे याची माहिती ते थेट पंतप्रधान, राष्ट्रपती, सेलिब्रिटी व अनेक मान्यवरांना सोशल मीडियावरून देत असतात.

जुह सिल्व्हर बीचवर मोठ्या प्रमाणात टार बॉल आल्यामुळे हा बीच काळवंडलेला दिसत आहे. गेल्या 20 जुलै रोजी येथे मोठ्या प्रमाणात टार बॉल वाहून आल्याचे वृत्त लोकमत ऑनलाईन आणि लोकमत वर्तमानपत्रातून सर्वप्रथम देऊन लोकमतने याविषयी नागरिकांना अलर्ट केलें होते अशी माहिती त्यांनी दिली. या संदर्भात लोकमतला अधिक माहिती देताना कनोजिया यांनी सांगितले की, खोल समुद्रात मोठी मालवाहू व तेलवाहू जहाजे असतात. त्यामधील ऑइल समुद्रात मिसळते आणि मग भरतीत हे ऑइल टार बॉल विशेष करून पावसाळ्यात समुद्र किनारी वाहून येतात तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बीचवर चालता ना या ऑइल टार बॉलचा खूप उग्र वास येतो आणि जर ते कपड्याला लागल्यास लवकर निघत नाहीत आणि अंगाला खाज व अँलर्जी येते.

कोळी महासंघाचे सरचिटणीस मत्स्य अभ्यासक राजहंस टपके यांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, खोल समुद्रातील देशी-विदेशी मालवाहू किंवा तेल वाहू जहजांमधून झालेल्या तेल गळतीमुळे या ऑईलच्या गुठळ्या जुहू समुद्रकिनारी आल्या असतील. तर आमच्या मच्छिमारांचे म्हणणे आहे की, मुंबई हायमध्ये असलेल्या तेल विहीरीमधून तेल काढत असताना होणाऱ्या गळतीमुळे या ऑईलच्या गुठळ्या येथे आल्या असतील. साधारण पावसात समुद्र खवळलेला असतो. पावसात भरतीत या ऑइल गुठळ्या मुंबईतील समुद्रकिनारी आढळतात अशी माहिती टपके यांनी दिली. इतर देशात जर आपली जहाजे गेली तर तिकडे आंतरराष्ट्रीय नॉर्मसप्रमाणे जहाजातील टाकाऊ पाणीच काय पण साधा कचरा व समुद्रात ऑइलपण सोडता येत नाही. मात्र आपल्याकडील शासकीय यंत्रणा कमकुवत असल्यामुळे अशा घटना नेहमीच घडतात अशी माहिती टपके यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :मुंबई