मुंबई : सोलापूर भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांना उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी खोटे जातप्रमाणपत्र सादर केल्याबद्दल तहसीलदारांनी खासगी तक्रार नोंदविली नसल्यास, पुढील सुनावणीपर्यंत तक्रार नोंदवू नये आणि तहसीलदारांनी तक्रार नोंदविली असल्यास योग्य ती कारवाई करा, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.दरम्यान, या प्रकरणी अक्कलकोट नायब तहसीलदारांकडून खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे. जात पडताळणी समितीच्या आदेशावरून नायब तहसीलदारांनी तक्रार केली आहे. सोलापूर जात पडताळणी समितीने भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाला जयसिद्धेश्वर स्वामींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. समितीचा निर्णय रद्दबातल ठरवावा, अशी विनंती जयसिद्धेश्वर स्वामींनी उच्च न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील पुढील सुनावणी १३ मार्च रोजी ठेवली आहे. जातीचा दाखला सादर करण्याचे निर्देश दिल्यावर, जयसिद्धेश्वर स्वामी यांनी जातीचा दाखला हरवल्याचे समितीला सांगितले.
जयसिद्धेश्वर स्वामींना कोर्टाचा तूर्तास दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:37 IST