मुंबई : ओशिवरा रिलीफ रोडवर अवैधरीत्या पार्किंग व मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या अतिक्र मणामुळे या मार्गावर अपघातांची संख्या वाढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.ओशिवरा रिलीफ रोड हा साठ फुटी रोड आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता हा रस्ता पादचाऱ्यांकरिता केवळ १५ फूट शिल्लक आहे. या रस्त्याच्या दुतर्फा काही ठेकेदारांनी अवैधरीत्या टेम्पो पार्क केलेले आहेत. त्यात दुकानांची जागा असूनही रस्त्यात काही दुकानदार सामान ठेवून अतिक्रमण करतात. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई वाहतूक विभाग, पोलीस व पालिका विभाग यांच्याकडे अनेकदा या अतिक्रमणावर व अवैध वाहतूक पार्किंगवर कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, या सर्व संबंधित यंत्रणेने या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले आहे. गेल्या आठवड्यात ओशिवरा भागात तीन अपघात घडले असून, यात फरहान फिरोझ खान (१२) याला जीव गमवावा लागला तर हर्ष जयपाल दुर्गा (९) या चिमुरड्याचा पाय बसखाली सापडून त्याला दुखापत झाली. शनिवारी एका इंडिका कारने धडक दिल्याने चहावाला जखमी झाल्याची घटना घडली. या रस्त्यावरील अतिक्रमणासंदर्भात के पश्चिम पालिका विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. (प्रतिनिधी)
ओशिव-यातील अतिक्र मणे ठरताहेत अपघाताला निमंत्रण
By admin | Updated: September 15, 2014 01:46 IST