Join us  

बुलेट ट्रेन प्रकल्पावर अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट; ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 7:37 PM

Indian Railway Minister Ashwini Vaishnav On Bullet Train India: अश्विनी वैष्णव यांच्या मुंबई दौऱ्यात पुणे ते नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

Indian Railway Minister Ashwini Vaishnav On Bullet Train India: आताच्या घडीला वंदे भारत, अमृत भारत यांसह स्लीपर वंदे भारत, वंदे भारत मेट्रो, आरआरटीएस यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. यातच भारताच्या सर्वाधिक महत्त्वाकांक्षी मानल्या गेलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत माहिती दिली आहे. अश्विनी वैष्णव मुंबई दौऱ्यावर आहेत.

यावेळी अश्विनी वैष्णव यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीत पुणे ते नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत अश्विनी वैष्णव यांनी काही महत्त्वाचे अपडेट सांगितले.

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानच्या ५०८ किमी लांबीच्या कॉरिडॉरवरील सुरत-बिलिमोरा हा टप्पा जुलै-ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यान्वित होऊ शकतो. यानंतर एकामागून एक अन्य टप्पे सुरू करण्यात येतील. बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये 'मर्यादित थांबे' आणि 'सर्व थांबे' अशी सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहेत. मर्यादित थांब्यांसह बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण करू शकेल. तर, तर इतर सेवांमध्ये हेच अंतर सुमारे २ तास ४५ मिनिटांत कापले जाऊ शकेल. बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत १२ स्थानके असतील. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) यांच्या माध्यमातून अंमलबजावणी केली जात आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. 

बुलेट ट्रेन प्रकल्पाला उशीर होत असल्याबाबत रेल्वेमंत्र्यांनी तत्कालीन महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला जबाबदार धरले आहे. ठाकरे सरकारने त्वरीत सर्व परवानग्या दिल्या असत्या तर आतापर्यंत या प्रकल्पात मोठी प्रगती दिली असती. मात्र, राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (शिवसेना-भाजपा) सरकार स्थापन होताच १० दिवसांत परवानग्या देण्यात आल्या, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :बुलेट ट्रेनभारतीय रेल्वेअश्विनी वैष्णव