Join us  

भारतीय हवाई क्षेत्रातील बिघाड, अपघातांच्या प्रमाणात झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 7:02 AM

२००८ ते २०१५ या कालावधीत जगभरात विमान अपघातांच्या प्रमाणात घट झाली होती

मुंबई : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात होणाऱ्या एअरमिस (बिघाड, अपघात) यांचे प्रमाण जगाच्या तुलनेत अधिक आहेत. परिणामी सुरक्षिततेच्या अधिक उपाययोजना आखण्याची मागणी आता होऊ लागली आहे. माहिती अधिकारांतर्गत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) मिळालेल्या माहितीनुसार भारतातील हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये घडणाºया बिघाड, अपघातांचे प्रमाण सन २०१८ मध्ये प्रति १० लाख फ्लाइटमागे १६.१८ आहे. २०१७ च्या तुलनेत त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. २०१७ मध्ये हे प्रमाण १०.४१ होते. तर, २०१४ ला १६.४९, २०१५ ला ११.७५ व २०१६ ला १३.१ होते. २०१४ ते २०१८ या पाच वर्षांच्या कालावधीत २०१४ ला हे प्रमाण सर्वात जास्त १६.४९ एवढे होते. त्यानंतर ते कमी होऊन आता पुन्हा वाढले आहे. अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी डीजीसीएकडे माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या माहितीनंतर ही बाब समोर आली आहे.

२००८ ते २०१५ या कालावधीत जगभरात विमान अपघातांच्या प्रमाणात घट झाली होती. या कालावधीत १११ अपघातघडले. यातील १५ अपघातांमध्ये जीवितहानी झाली होती. त्यामध्ये ५४४ जणांना जीव गमवावा लागला होता. तर २०१६ मध्ये जगभरात १३४ अपघात घडले. त्यापैकी ८ अपघातांमध्ये जीवितहानी झाली. यामध्ये १८३ जणांचा मृत्यू झाला होता. २००८ ते २०१५ या कालावधीत भारतात झालेल्या ८ अपघातांपैकी २ अपघातांमध्ये जीवितहानी झाली होती व १५९ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०१६ मध्ये भारतात ३ अपघात झाले. सुदैवाने त्यामध्ये जीवितहानी झाली नव्हती. याबाबत अल्मेडा व पिमेंटा म्हणाले, २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये बिघाड, अपघातांचे प्रकार वाढल्याने ते टाळण्यासाठी अधिक कडक उपाययोजना आखण्याची गरज आहे. डीजीसीएकडून जास्त कठोर उपाययोजना आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. देशातील हवाई वाहतूक क्षेत्राची वाढ होत असताना बिघाड, अपघात कमीत कमी होतील याची काळजी घेणे गरजेचे आहे.हवाई प्रवास महागणार, उड्डाण सुरक्षा शुल्कात वाढहवाई प्रवाशांना यापुढे प्रवासासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे हवाई प्रवास काहीसा महागणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने उड्डाण सुरक्षा शुल्कामध्ये वाढ केली आहे. त्यानुसार देशांतर्गत प्रवासासाठी प्रति प्रवासी सध्या १३० रुपये असलेले शुल्क १५० रुपये करण्यात आले आहे. १ जुलैपासून हा बदल अमलात येईल, असे मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. परदेशी प्रवास करताना प्रवाशांना द्यावे लागणारे शुल्कदेखील वाढवण्यात आले आहे. परदेश प्रवास करणाºया प्रवाशांना सध्या ३.२५ अमेरिकन डॉलर्स शुल्क आकारले जाते. १ जुलैपासून त्यासाठी ४.८५ अमेरिकन डॉलर्स आकारले जातील किंवा त्याची भारतीय रुपयातील किंमत आकारली जाईल. आतापर्यंत प्रवासी सुरक्षा शुल्क म्हणून हे शुल्क आकारले जात होते ते यापुढे उड्डाण सुरक्षा शुल्क म्हणून आकारले जाईल. १ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.

टॅग्स :भारतीय हवाई दलमुंबई