Join us  

चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानभरपाईत वाढ, निकषापेक्षा अधिक आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 4:20 AM

नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णत: क्षतिग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी/वस्तूंकरता प्रति कुटुंब २५०० रुपये इतकी मदत एसडीआरएफच्या निकषानुसार दिली जाते.

मुंबई : निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना निकषापेक्षा जास्त आर्थिक मदत देण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळला असून त्या संबंधीचा आदेश बुधवारी काढण्यात आला. त्यानुसार किमान १५ टक्के नुकसान झालेल्या घरांमधील कपडे वा वस्तूंसाठी भरपाई दिली जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णत: क्षतिग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी/वस्तूंकरता प्रति कुटुंब २५०० रुपये इतकी मदत एसडीआरएफच्या निकषानुसार दिली जाते. मात्र ती प्रति कुटुंब ५ हजार रुपये कपड्यांच्या नुकसानीसाठी तर प्रति कुटुंब ५ हजार रुपये घरगुती भांडी/वस्तूंच्या नुकसानीपोटी देण्याचा निर्णय राज्य सरकारने आधीच घेतला आहे.आजच्या आदेशानुसार किमान १५ टक्के पडझड झालेल्या कच्च्या व पक्क्या घरांपैकी ज्या घरांचे छत क्षतिग्रस्त झाल्याने अथवा पत्रे उडून गेल्याने घरातील कपडे व घरगुती भांड्यांचे/ वस्तूंचे नुकसान झाले आहे अशा प्रकरणातही हीच मदत दिली जाणार आहे. अंशत: म्हणजे किमान १५ टक्के पडझड झालेल्या घरांसाठी १५ हजार रुपये प्रति घर मदत दिली जाईल. एसडीआरएफनुसार प्रचलित दर ६ हजार रुपये प्रति घर इतकी आहे.अंशत: पडझड परंतु किमान २५ टक्के नुकसान झालेल्या पक्क्या/कच्च्या घरांसाठी १५ हजार रुपये प्रति घर या ऐवजी २५ हजार रुपये प्रति घर एवढी मदत दिली जाईल. अंशत: पडझड परंतु किमान ५० टक्के नुकसान झालेल्या पक्क्या/कच्च्या घरांसाठी ५० हजार रुपये प्रति घर इतकी मदत दिली जाईल. दोन्हींबाबत याआधी ही मदत पंधरा हजार रुपये इतकी होती. पूर्णत: नष्ट झालेल्या पक्क्या/कच्च्या घरांसाठी पूर्वीप्रमाणेच दीड लाख रुपये प्रति घर मदत दिली जाईल.>मच्छीमारांनाही मदतमच्छिमारांना बोटींची अंशत: दुरुस्ती करण्यासाठी दहा हजार रुपये इतकी मदत दिली जाईल. पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी २५ हजार रु.इतकी मदत दिली जाईल.अंशत: बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ हजार रुपये तर पूर्णत: नष्ट झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठीदेखील प्रत्येकी ५ हजार रुपये इतकी मदत दिली जाणार आहे.>अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीराज्यात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठीचे निर्णय घेण्याकरता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमितीची मंगळवारी पुनर्रचना करण्यात आली. त्यात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा समावेश असून तीन ज्येष्ठ अधिकारीदेखील सदस्य आहेत.

टॅग्स :निसर्ग चक्रीवादळचक्रीवादळ