महाड : पक्ष संघटनेचे मूल्यमापन हे प्रत्येक निवडणुकीतच होत असते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात २५ वर्षे असलेली शिवसेनेबरोबरची युती तुटल्यानंतर भाजपाला स्वतंत्रपणे लढण्याची संधी मिळाली, स्वतंत्र लढण्यामुळेच भाजपाला राज्यात आपली ताकद आजमावता येवू शकली, असे उद्गार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी काढले. दानवे हे कोकण दौऱ्यावर आले असता, महाड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत पक्षीय प्रवक्ते माधव भंडारी, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, आ. प्रशांत ठाकूर, माजी खा. रामशेठ ठाकूर, माजी आ. मधू चव्हाण, विनय नातू, राजन तेली आदी नेते उपस्थित होते.दानवे म्हणाले की, आजपर्यंत भाजपाला केवळ शहरी पक्ष म्हणून हिणवले जात होते. मात्र विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढूनही सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा नावारूपास आला. यावरून ग्रामीण भागातही भाजपाची ताकद वाढल्याचे दिसून आले. कोकणवासीयांना विकासाचा खरा चेहरा पहायला मिळालेला नाही, आता कोकणवासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील विकासाला चालना देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक येत्या काळात कोकणात घेण्यात येईल, असेही दानवे यांनी सांगितले. यापुढील काळात राज्यात विजेचे संकट ओढवू नये यासाठी जैतापूर प्रकल्प व्हावा ही काळाची गरज आहे. शिवसेनेचे मन वळवण्यात आपल्याला यश येईल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठीचे भूसंपादन होवून शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाही देण्यात आला आहे. विजेच्या दरासंबंधित सकारात्मक निर्णय शासकीय पातळीवर होईल, प्रकल्प राबवताना फायदे - तोटे असतानाच मात्र हा प्रकल्प राबवताना जनतेच्या हिताला बाधा येणार नाही याबाबत शासन जबाबदारीचे भान ठेवेल, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
कोकणात पक्षाची ताकद वाढवणार!
By admin | Updated: June 23, 2015 00:30 IST