बोर्ली पंचतन : विविध संतांनी रचलेल्या भारुडाने जागृतीचे कार्य केले. त्याचप्रमाणे समाजाला विविध वळणावर जागृत करण्याचे कार्य साहित्यातून होत आहे. आपल्या देशामध्ये साहित्य विश्वाचा वाटा फार मोठा असून फेसबुक, टिष्ट्वटरमध्ये रमलेल्या तरुणांना साहित्य वाचनाची आवड लावण्याची गरज असल्याचे मत रायगडचे माजी पालकमंत्री, आमदार सुनील तटकरे यांनी केले, तर संमेलनाध्यक्ष डॉ. विश्वास मेहंदळे यांनी साहित्यामुळे शिक्षण जागृती, प्रेरणा देण्याचे कार्य करते, असा विश्वास व्यक्त केला. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकरांनी श्रीवर्धनचा नटलेला समुद्रकिनारा पाहून आपल्याला परदेशातील समुद्रकिनाऱ्यावर असल्याचा भास होत असल्याचे सांगितले. श्रीवर्धन येथे रायगड जिल्हास्तरीय कोकण मराठी साहित्य परिषदेचे ८ व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. सोमजाई साहित्यनगरी र.ना. राऊत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या श्रीवर्धन शाखेच्यावतीने ८ व्या रायगड जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन तटकरे यांच्या हस्ते झाले. ग्रंथप्रदर्शन व रंगावली प्रदर्शनाचे उद्घाटन कविवर्य अशोक नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शर्मिला जोशी व सीमा रिसबुड यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी आमदार अवधूत तटकरे, कोमसाप जिल्हाध्यक्षा सुनंदा देशमुख, स्वागताध्यक्षा व नगराध्यक्षा कविता सातनाक, शोभाताई सावंत, नमिता किर, रेखाताई नार्वेकर, राजिप सदस्य शाम भोकरे, सभापती देविदास कावळे, उपसभापती प्रगती आदवडे, उपनगराध्यक्ष फैसल हुर्झुक, निवेदक किशोर सोमण तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. विनोदी शैलीमध्ये अशोक नायगावकर यांनी राजकीय चिमटे काढताना उपस्थितांची दाद मिळविली. सुनील तटकरे यांनी जिल्हास्तरीय साहित्य संमेलन पेशव्यांच्या श्रीवर्धन भूमीत होत असल्याचा आनंद होत असून महाराष्ट्रातील साहित्यिकांनी आजपर्यंत साहित्याच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचे काम केले आहे. जीवन आनंदीपणे जगायचे असेल तर साहित्य वाचनातून प्रेरणा मिळते, असा विश्वास व्यक्त केला.समाज चुकीच्या वळणावर असेल तर साहित्य उत्तम मार्गदर्शन करू शकते. मराठी साहित्य संमेलन या ऐवजी वाड्मय संमेलन असा बदल व्हावा, असेही मेहंदळे यांनी सुचविले. त्यांनी काही राजकीय टिपण्णीही केल्या. उद्घाटनाचे सूत्रसंचालन सुधीर शेठ तर आभार दिलीप हेंद्रे यांनी मानले. सकाळी ८.३० वा. सोमजाई देवी मंदिरापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढली. (वार्ताहर)च्सकाळी सोमजाई देवी मंदिरापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. यामध्ये विविध वेशभूषेतील विद्यार्थी सजले होते व वारकरी मंडळीही यामध्ये सहभागी झाली होती, तसेच वीरेश वाणी या स्थानिक रंगावलीकाराने मधु मंगेश कर्णिक, व. पु. काळे, विं. दा. करंदीकर, पु. ल. देशपांडे व सुनील तटकरे यांच्या प्रतिमेच्या रांगोळ्या काढल्या.
तरुणांची साहित्याची आवड वाढावी
By admin | Updated: April 18, 2015 23:08 IST