Join us

होळीमुळे पुरणपोळीच्या मागणीत वाढ

By admin | Updated: March 4, 2015 23:12 IST

पुरणपोळीशिवाय होळी ही कल्पनाच सहन होत नाही ना? पण आता धावपळीच्या काळात नोकरदार महिलांना पुरणपोळी बनविण्याचा घाट घालणे शक्य होत नाही.

पूनम गुरव ल्ल नवी मुंबईपुरणपोळीशिवाय होळी ही कल्पनाच सहन होत नाही ना? पण आता धावपळीच्या काळात नोकरदार महिलांना पुरणपोळी बनविण्याचा घाट घालणे शक्य होत नाही. पण नवी मुंबईतील विविध महिला मंडळांनी आणि बचत गटांनी हा प्रश्न सोडवला आहे. साजूक तुपातल्या पुरणपोळ््या आॅर्डरनुसार बनवून, त्या घरपोच देऊन होळीचा आनंद द्विगुणीत करण्याचे काम या संस्था करत आहेत.होळीचा नैवेद्य पुरणपोळीशिवाय पूर्ण होतच नाही. पण पुरणपोळी बनवण्याचे कामही अवघड आणि वेळखाऊ असते. पुरणपोळी बनविण्यासाठी लागणारा निवांतपणा आणि पुरेसा वेळ नोकरी करणाऱ्या महिलांना मिळत नाही. त्यामुळे पारंपरिक पध्दतीने होळी साजरी करणे कठीण होऊन बसते. ही अडचण लक्षात घेऊन नवी मुंबईतील विविध महिला बचत गटांनी पुरणपोळी बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. याला ग्राहकवर्गाकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.पुरणपोळी बनविण्याकरिता मैदा किंवा गव्हाचे पीठ, गूळ, चण्याची डाळ, तूप आदी साहित्य लागते. या साहित्याच्या किमतीत दरवर्षी वाढ होते. त्यामुळे पुरणपोळीच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. कोपरखैरणे येथील यशोदा महिला मंडळ पुरणपोळी बनविण्याचे काम करते. होळीच्या एक दिवस आधी पुरणपोळ््या बनविण्याचे काम सुरू केले जाते. आॅर्डरनुसार होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी घरपोच पुरणपोळी देण्याची सोय करण्यात आली आहे. एका पुरणपोळीसाठी तब्बल १४ रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. अनेक ग्राहक ६ किंवा १२ नगांची मागणी करत आहेत. यशोदा महिला मंडळाने कोपरखैरणे रेल्वे स्थानक आणि बाजारपेठेच्या परिसरामध्ये स्टॉल उभारला आहे. या माध्यमातून गेल्या दोन दिवसांपासून पुरणपोळीची आॅर्डर घेतली जात आहे. बचत गटातील १५ ते २० महिला पुरणपोळी बनविण्याचे काम करत आहेत. नोकरदार महिलांबरोबरच नोकरीनिमित्त कुटुंबापासून दूर राहिलेल्या अविवाहित तरुणवर्गानेही पुरणपोळीसाठी आॅर्डर दिल्या आहेत. अशा रितीने ग्राहक आणि विक्रेते दोघांचीही सोय झाली आहे.होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. पण नोकरदार महिलांना वेळेअभावी पुरणपोळी बनवणे शक्य होत नाही. म्हणून महिला मंडळाच्या वतीने हा व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून केला जात आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांना उदरनिर्वाहाचा मार्ग गवसला आहे आणि ग्राहकांना सणाचा गोडवा चाखता येत आहे. - डॉ. राजश्री पाटील, अध्यक्ष, यशोदा महिला मंडळ