मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एमएमआरडीएच्या दोन मेट्रो मार्गांचे भूमिपूजन रविवारी पार पडले. या मेट्रोमार्गांचे भाडे १0 ते ३0 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. परंतु भविष्यात प्रकल्पाचा खर्च वाढल्यास आणि तो अपेक्षित कालावधीत पूर्ण न झाल्यास मुंबईकरांवर भाडेवाढीची टांगती तलवार कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो ७ रेल्वेमार्गाच्या प्रवासी भाडेदरास शासनाने मान्यता दिली आहे. या भाडेदरानुसार 0-३ किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी प्रवाशांना १0 रुपये तर ३ ते १२ किलोमीटरसाठी २0 आणि १२ ते त्यापुढील किलोमीटरसाठी ३0 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. हा मार्ग १६.५ किमोमीटरचा असून, त्यावर १६ स्थानके असतील. या मेट्रोसाठी ४,७३७ कोटींचा खर्च अपेक्षित असून, तो २0१९पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु प्रकल्पाचा कालावधी वाढल्यास प्रकल्पाचा खर्च लांबणीवर जाईल.तर दहिसर ते डी.एन. नगर या मेट्रो २चे प्रवासी भाडेही मेट्रो २च्या पहिल्या टप्प्याप्रमाणे असणार आहे. हा मार्ग १८.५ किलोमीटरचा असून, त्यावर १७ स्थानके असतील. त्यासाठी ४ हजार ९९४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हे दोन्ही प्रकल्प राबविण्यासाठी अनेक अडथळे येणार असल्याने प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च कित्येक पटीने वाढण्याची शक्यता आहे.
मेट्रोचा खर्च वाढल्यास भाडेवाढीची शक्यता
By admin | Updated: October 13, 2015 02:27 IST