Join us  

CoronaVirus News: देशातील ऑक्सिजन टंचाईला जबाबदार कोण?; मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलं नेमकं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:40 PM

CoronaVirus News: सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन व्यवस्थापनाचं कौतुक

मुंबई: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना वैद्यकीय सुविधांचा अभाव जाणवू लागला आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनची टंचाई आहे. ऑक्सिजनचं व्यवस्थापन कसं करायचं ते मुंबई महापालिकेकडून शिका, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली आणि केंद्राला सुनावलं. याबद्दल मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ऑक्सिजन तुटवड्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य करणं योग्य नाही. यासाठी राज्य सरकारच जबाबदार आहेत, असं चहल म्हणाले.धोका वाढला! म्युकरमायकोसिस मुंबईच्या वेशीवर पोहोचला; ठाण्यात पहिल्या रुग्णाची नोंदअनेक राज्यं त्यांच्याकडे आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांचा योग्य आकडा सांगत नाहीत. मग केंद्र त्यांना ऑक्सिजनचा पुरेसा साठा कसा पुरवणार, असा सवाल चहल यांनी उपस्थित केला. ऑक्सिजन टंचाईला केवळ राज्यंच जबाबदार आहेत, असं चहल म्हणाले. ऑक्सिजन तुटवड्यासाठी केंद्राला जबाबदार धरण्यात येऊ नये, हे सांगताना चहल यांनी महाराष्ट्र आणि इतर राज्यांचं उदाहरण दिलं. 'महाराष्ट्रातील प्रशासन अतिशय प्रामाणिकपणे कोरोना रुग्णांचा आकडा जाहीर करतं. त्यामुळेच महाराष्ट्रात शेजारील राज्यांसारखी परिस्थिती उद्भवली नाही. बाकीच्या राज्यांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासत आहे. मात्र महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही,' असं चहल यांनी सांगितलं.महाराष्ट्राला मोठा दिलासा, दैनंदिन रुग्णवाढ ४० हजारांच्या खाली, बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले'राज्यात दररोज ६० हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होते आणि प्रशासन हा आकडा जाहीर करतं. संपूर्ण देश आमच्यावर हसतो. मात्र देशातील अनेक राज्यं त्यांच्याकडील कोरोना रुग्णांचा नेमका आकडा सांगत नाहीत. मग केंद्र त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा कसा काय करणार?', असा सवाल चहल यांनी उपस्थित केला. 'राज्यं सरकार कोरोना रुग्णांचा आकडा कमी सांगत असतील किंवा चाचण्या कमी करत असतील, तर मग केंद्र त्यांना कोणत्या आकडेवारीच्या आधारावर ऑक्सिजनचा साठा पुरवणार? आमच्याकडे दिवसाला १ ते २ हजारच कोरोना रुग्णांची नोद होते असं राज्य सरकारं सांगत असतील. तर मग त्यांना तितक्याच प्रमाणात ऑक्सिजन साठा मिळणार आणि तो कमीच पडणार. याचा पूर्णत: फटका सर्वसामान्यांना बसणार,' असं पालिका आयुक्तांनी सांगितलं.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका