Join us  

युती झाली तर ‘स्वाभिमान’ सर्व जागा लढविणार - राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:26 AM

भाजपा-सेनेची युती झाली तर स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार सर्व जागा लढवतील, असे खा. नारायण राणे यांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

मुंबई : भाजपा-सेनेची युती झाली तर स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार सर्व जागा लढवतील, असे खा. नारायण राणे यांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. काँग्रेसमध्ये जाण्याचा राणे यांनी इन्कार केला. स्वत:च्या राजकीय भवितव्याबाबत राणे यांनी अजूनही ठोस निर्णय घेतला नसल्याचे या मुलाखतीवरून स्पष्ट झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला २०० जागा मिळतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीने तुम्हाला पाठिंबा दिला तर तो घेणार का या प्रश्नात त्यांनी होय पाठिंबा घेऊ, असे सांगितले. राणे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बाबत ते म्हणाले की, आपली राजकीय चर्चा झाली पण जागावाटपाबाबत चर्चा झाली नाही.भाजपाच्या प्रचार समितीचा मी सदस्य आहे. या समितीचा राजीनामा देण्याची गरज नाही. पक्षाने मागितला तर राजीनामा देईन पण तशी वेळ येणार नाही, असे राणे म्हणाले.

टॅग्स :नारायण राणे