लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या जलक्रीडा व्यावसायिकांनी सोमवारी राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांची मंत्रालयातील दालनात भेट घेऊन जलक्रीडा सुरु करण्याबाबत निवेदन दिले. त्यावेळी राज्यातील जलक्रीडा सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्यात येइल, असे, आश्वासन अस्लम शेख यांनी दिले आहे.
अस्लम शेख यांनी शिष्टमंडळास कार्यप्रणाली तयार करण्यासोबत बंदर विभाग व पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून जलक्रिडा व्यवसायाशी निगडीत विविध परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्याचे आश्वासन दिले. अस्लम शेख म्हणाले की, महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे. राज्य सरकारचा बंदरे विभाग व पर्यटन विभागाच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय वाढावा यासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अरविंद मोंडकर, काॅंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, देवबाग वाॅटर स्पोर्टचे राजन कुमठेकर आदी उपस्थित होते.
------------------------------------------