भार्इंदर : शहरात डेंग्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर ठोस उपाययोजना न केल्याने याची लागण झालेल्या अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूला आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा नगरसेवक अनिल भोसले यांनी शनिवारच्या महासभेत केली. महासभा सुरू होताच काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी डेंग्यूवर लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर, सभागृहात सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरून या आजाराला नियंत्रित करण्यासाठी आरोग्य विभागाकडून पुरेशी औषध फवारणी होत नसल्याचा आरोप केला. या आरोपांना खोडून प्रशासनाने अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यास अडचण निर्माण होत असल्याचा दावा केला. त्यावर काँग्रेसचेच फरीद कुरेशी यांनी पालिकेने आरोग्य विभागासाठी नियुक्त केलेल्या २४९ कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १२५ कर्मचारीच या विभागात कार्यरत असून उर्वरित कर्मचाऱ्यांना त्वरित या विभागात सामावून घेण्याची मागणी केली. तसेच या विभागाकडे औषध फवारणी वाहनांचा तुटवडा असतानाही त्यावर कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्यावर नाराजी व्यक्त केली. हा आजार रोखण्यास प्रशासनाला अपयश आले असून या आजारामुळे अनेक जण दगावले आहेत. त्यास आरोग्य विभागाच्याच अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भोसले यांनी केली. यावर प्रशासनाने ज्यांच्या घरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी डेंगी डासांच्या अळ्या आढळतील, तेथील जबाबदार व्यक्तींवर भादंवि २६८, २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)
डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा?
By admin | Updated: November 17, 2014 00:06 IST