मुंबई : घरातील वादविवाद, पालकांकडून रागावणे, अभ्यासाचा कंटाळा, चित्रपटांचे आकर्षण या तसेच अनेक कारणांमुळे मुले घर सोडून जातात आणि पुन्हा परतीचा मार्ग पत्करतही नाहीत. मात्र अशा मुलांची घरवापसी रेल्वे पोलिसांकडून (आरपीएफ) करण्यात आल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.घरातून पलायन केलेल्या आणि वर्षभरात कोकण रेल्वेमार्गावर सापडलेल्या ५४ मुलांना रेल्वे पोलिसांनी त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. ही सगळी मुले १५ वर्षांखालील आहेत. या मुलांची पूर्णपणे समजूत काढून आणि त्यांची मानसिकता बदलून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे पोलिसांनी वर्षभरात ३५ हजार दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या असून, त्यांची एकूण किंमत ३0 लाख ५ हजार रुपये एवढी आहे. हा माल राज्य उत्पादन शुल्काकडे देण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे १८३ केसेस कोकण रेल्वेमार्गावरून प्रवास करताना सिगारेट पिणाऱ्या प्रवाशांच्या उघडकीस आल्या आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईतून ३६ हजार ६00 रुपये उत्पन्न मिळाले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून वर्षभरात ५४ मुलांची घरवापसी
By admin | Updated: January 24, 2015 02:03 IST