विशेष- मृदुला दामले
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कीर्तनकार, प्रवचनकार, भारताचार्य श्री. सु़ ग. शेवडे हे १९ जुलै २०१५ या दिवशी ८१व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख..
सुरेश शेवडे यांचा जन्म १९ जुलै १९३५ रोजी बडोद्याला झाला. त्यांचे आजोबा गोविंदशास्त्री षडशास्त्री ( सहा शास्त्रांचे शास्त्री) होते. पण ते फार लवकर निवर्तले. वडील बडोद्यात सरकारी अधिकारी होते. बडोदा हायस्कूलमध्ये सुरेशचे शालेय शिक्षण झाले, तर महाराजा सयाजीराव विद्यापीठातून त्यांनी बी.ए.बी.एड. केले. लहानगा सुरेश आजीला (आईची आई) रामदासी मठात कीर्तनाला, प्रवचनाना घेऊन जात असे. मला वाटत त्यातूनच छोट्या सुरेशला ईश्वरभक्तीचं, कथाकीर्तनाच बाळकडू मिळालं. खऱ्या अर्थाने कोवळ्या वयात त्याचे मन अध्यात्मात रमू लागल. रामचंद्रबुवा शिरवळकर, आफळेबुवा, कोपरकरबुवा इत्यादींची कीर्तने सुरेश मन लावून ऐकत असे. गोविंदस्वामी आफळेबुवांची तो नक्कलही करीत असे. मुळात अभ्यासू वृत्ती, वाचनाची आवड व चांगली श्रवणभक्ती हे अंगभूत त्रिगुण असल्याने वयाच्या १२ व्या वर्षी पहिले कीर्तन केले व पुढे करीतच राहिला. बालकीर्तनकार म्हणून त्याचा नावलौकिकही होऊ लागला. समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी, त्यातून केलेलं निरीक्षण, वाचन, अभ्यास, स्पष्टोच्चार, ओघवती वाणी याबरोबरच कीर्तनकाराला संगीताची जाण असणं, बैठक असणं आवश्यक आहे, हे कळल्यानंतर सुरेशने गाणंही शिकण्यास सुरुवात केली, पण त्यात फारसं यश आलं नाही. शालेय शिक्षण चालू होतच, पण पुस्तकी ज्ञानात त्याचं मन रमत नव्हतं. अध्यात्माची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. १९५२ साली मॅट्रिक झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी चित्रकलेतील कसब जाणून बडोद्यातील ‘कलाभवन इंजिनीअरिंग कॉलेज’ला आर्किटेक्चरला त्यांचा प्रवेश घेऊन टाकला. आपल्या मुलाने कीर्तनकार व्हावे, हे त्यांना अजिबात मान्य नव्हते. सुरेशने अनेक वेळा वडिलांना हे सांगूनही त्याचा उपयोग झाला नाही. वैफल्यग्रस्थ मन:स्थितीत वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी त्यांनी घर सोडलं. तिथून पाँडेचरीला गेल्यावर दत्त नावाच्या व्यापाऱ्याशी त्यांची ओळख झाली. तो व्यापारी त्याला हृषीकेश येथील ‘परमार्थ भवन’मध्ये घेऊन गेला. अतिशय कठोर तपश्चर्या, साधना, परिश्रम, जपजाप्य, ध्यानधारणा करूनही सुरेशला जेव्हा परमेश्वराचे दर्शन झाले नाही, तेव्हा तो नैराश्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला. गंगेत उडी घेणार तेवढ्यात एका साधू महाराजांनी त्याला अडविले. त्या स्वामींचे नाव होते स्वामी आत्मानंद. सहा महिने या स्वामींच्या सहवासात सुरेशला अध्यात्मिकतेचा आनंद मिळाला. तिथे त्यांना अनेक अनुभव आले. त्या आनंदप्राप्तीनंतर मात्र स्वामीजींनी त्याला घरी परत जाण्याची आज्ञा केली. ती त्याने पाळलीही. घरी परतल्यावर त्यांनी आटर््सला प्रवेश घेतला. १९५८मध्ये मराठी व संस्कृत या विषयांमध्ये बी.ए. पदवी मिळविली. आलेल्या अनुभवातून ते जास्त धार्मिक बनले. धोतर, अंगरखा, टोपी व कपाळाला गंधाचा टिळा असा पोषाख त्यांनी कायमस्वरूपी ठेवला. १३ फेब्रुवारी १९६०ला माया आपटेंशी त्यांचा विवाह झाला. तोपर्यंत बडोदा, अलिबाग, राजापूर अशा अनेक ठिकाणी शाळांमधून त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. आबा नोकरीनिमित्त ५ डिसेंबर १९६१ ला मुंबईत आले. याच वर्षी मोठा मुलगा सच्चिदानंद याचा जन्म बडोद्याला झाला. त्यानंतर विवेकानंद व मेधा अशी दोन अपत्ये झाली. आज दुर्दैवाने मेधा हयात नाही. आबा गिरगावातल्या डी. जी. टी. हायस्कूलमध्ये ते मराठी व संस्कृत शिकवत असत. पुढे त्यानी एम.ए. व १९७५ मध्ये एम.एड्. केले. काही वर्षे सकाळी ते खालसा कॉलेज व दुपारी सायन येथील डी. एस. हायस्कूलमध्ये शिकवीत. १९६७ साली त्यांची शहापूर येथील खाडे विद्यालयात मुख्याध्यापकपदी नेमणूक झाली. या शाळेत आबांनी अनेक उपयुक्त योजना राबविल्या. त्यानंतर तीन वर्षे वाडा येथील पांडुरंग झावजी विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून काम केले. काही वर्षे बोरीवलीच्या गोखले हायस्कूलमध्येही शिकविले. प्रवचन, कीर्तन, धर्मशास्त्र, वेदान्त यांचा अभ्यास, चिंतन, मनन इ. अव्याहतपणे चालू होतेच. १९७५ मध्ये आबांनी नोकरी सोडून पूर्णवेळ धर्मसेवेसाठी वाहून घेतले. ज्ञानेश्वरी, महाभारत, रामायण, भारतीय संस्कृती, भगवद्गीता, शंभूराजे, शिवाजी महाराज हे त्यांचे व्याख्यानाचे, प्रवचनाचे आवडते विषय आहेत. आपल्या रसाळ वाणीत रंजकतापूर्ण अभिनिवेश आणत ते आपले व्याख्यान कमालीचं खुलवितात. त्यांनी परदेशातही अनेक कार्यक्रम केले. आबांनी आतापर्यंत एकूण १२,००० च्या वर व्याख्याने व प्रवचने दिली आहेत, तर १३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच वर्षातले काही ठरावीक दिवस सातत्याने एखाद्या गावात प्रवचने करण्याचा मान त्यांना अनेक वर्षे मिळत आहे. ५१ वर्षे कोल्हापूर, ३५ वर्ष डेरवण, २४ वर्ष गजानन महाराज संस्थान, शेगाव येथील प्रवचनसेवा आजही अखंड चालू आहे. कीर्तनाचा वारसा पुढे सुरू राहाण्यासाठी गुरू-शिष्य पद्धतीने ज्ञानदान करण्यासाठी ‘एनीमेटे’ या गावी त्यांनी नरेंद्रबुवा हाटे यांच्यासह आश्रम उभारला आहे. आज वयाच्या ८०व्या वर्षीही आबांचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा आहे.