Join us  

Hafiz Saeed Arrest: 'भारताच्या कूटनीतीचं यश; पण पाकच्या ढोंगीपणापासून सावधान!'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 1:55 PM

हाफिज सईदला करण्यात आलेली अटक म्हणजे पाकिस्तानचे ढोंग

मुंबई : मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. हाफिज सईदच्या अटकेवरुन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी हाफिज सईदला करण्यात आलेली अटक म्हणजे पाकिस्तानचे ढोंग आहे. त्यामुळे भारताने सावध राहिले पाहिजे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.

 उज्ज्वल निकम म्हणाले, "हे भारताच्या कुटनीतीचे यशस्वी पाऊल आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील जे पुरावे सादर केले त्यामुळे पाकिस्तानचा नाईलाज झाला आणि त्यांनी कारवाई केली. पण हे पाकिस्तानचे ढोंग वाटत आहे. त्यामुळे भारताने सावध राहिले पाहिजे". याचबरोबर, पाकिस्तान हाफिज सईदला अटक केल्याचे सांगत जगाची फसवणूक करत आहे. पण, ते न्यायालयात काय पुरावे सादर करतात आणि त्याला दोषी सिद्ध करण्यासाठी काय प्रयत्न करतात ते पहावे लागेल. अन्यथा हे नाटक आहे, असेही यावेळी उज्ज्वल निकम यांनी सांगितले. 

हाफिज सईदच्या कारवाईमुळे भारताला मोठे यश मिळाले आहे. कारण, हाफिस सईदवर कारवाई करण्यासाठी भारताने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव टाकला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने हाफिज सईद व त्याच्या 12 निकटवर्तीयांविरोधात चॅरिटीच्या माध्यमातून संपत्ती जमा करुन त्याचा वापर दहशतवादी कृत्यासाठी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रकरणात सईदला अटक केल्याचे समजते. 

(26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक)

टॅग्स :उज्ज्वल निकमहाफीज सईदपाकिस्तान