Join us

तुंबणाऱ्या पाण्याचे मोठे संकट

By admin | Updated: June 9, 2014 02:13 IST

पावसाळ्यात रेल्वेसेवा सुरळीत राहण्यासाठी पावसाळापूर्व तयारी केली जाते. तरीही प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात रेल्वेला फटका बसतच असतो

मुंबई : पावसाळ्यात रेल्वेसेवा सुरळीत राहण्यासाठी पावसाळापूर्व तयारी केली जाते. तरीही प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात रेल्वेला फटका बसतच असतो. हीच परिस्थिती मुंबईतील रस्त्यांवरही दिसून येते. पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी तुंबत असल्याने त्याचा फटका बसतो आणि अनेक ठिकाणी वाहनचालकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. या वाहतूककोंडीतून सुटका करण्याचे मोठे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर असते. शहर आणि उपनगरांत ३० पेक्षा जास्त ठिकाणी वाहतूककोंडीचा सामना वाहतूक पोलिसांना यंदाही करावा लागणार आहे. यंदा १२ दिवस मोठी भरती येणार असून, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे. यात जून महिन्यातले ४ दिवस, जुलै महिन्यातले ३ दिवस, आॅगस्ट महिन्यातले ४ आणि सप्टेंबर महिन्यातला १ दिवस भरती येणार आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरात पाणी तुंबण्याचा धोका असल्याने त्याचा फटका बसून वाहतूककोंडी होऊ शकते. हे पाहता वाहतूक पोलिसांनी त्या दिवशी खास लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक पावसाळ्यात वाहतूक पोलिसांना ३०पेक्षा जास्त ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणांवरही वाहतूक पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. लाल बहादूर शास्त्री मार्गावर घाटकोपरपासून सायनदरम्यान घाटकोपर स्थानक, कमानी जंक्शन, शीतल सिग्नल, कल्पना सिनेमा सिग्नल, कुर्ला डेपो आणि माहीम निसर्ग उद्यानाच्या वळणावर वाहतुकीची कोंडी होत असते. त्याचप्रमाणे सांताक्रूझ येथे मिलन सबवे, विलेपार्ले एअरपोर्ट, अंधेरी मेट्रो जंक्शन, गोरेगाव येथील आरे चेकनाका, दिंडोशी, मालाड सबवे, मालाड जंक्शन, जोगेश्वरी पश्चिमेकडील अजित ग्लास स्टॉप कंपनीसमोर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)