Join us  

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना सरकारने घरटी रु. १०,००० मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 3:14 PM

कांदिवली (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आज कांदिवली (पूर्व) येथील तलाठी कचेरीवर काढलेल्या मोर्चाच्या वेळी मागमी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट असणारे लोकं तसेच चाळींमधील निम्न-मध्यम वर्गीय अशा सर्वच लोकांना रोजगारापासून वंचित राहावे लागल्यामुळे मुळातच त्यांच्याकडे कुठल्याही स्वरूपाची आर्थिक बचत आता राहिलेली नाही. अशा काळात वारंवार आलेल्या अतिवृष्टीच्या संकटामुळे 'दुष्काळात तेरावा महिना' अशी सर्वसामान्य माणसाची स्थिती झाली आहे. कोरोना महामारीमध्ये राज्य सरकारने एका रुपयाची ही मदत मुंबईकरांना केली नाही. 70, 000 कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेकडे वारंवार मागणी करून सुद्धा कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नाही. या कोरोना व बेसुमार पावसामुळे घरांवर तुळशीपत्र ठेवावे लागत असलेल्या मुंबईकरांच्या घराचे तात्काळ नजर पंचनामे करून घरटी 10,000 रुपयांची मदत करावी व झोपडपट्टीवासीय, चाळीतील रहिवासी, रिक्षा चालक, घरगुती काम करणाऱ्या महिला, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा सरसकट १०,००० रुपयांची मदत करण्याची मागणी कांदिवली (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आज कांदिवली (पूर्व) येथील तलाठी कचेरीवर काढलेल्या मोर्चाच्या वेळी बोलताना केली.

कोरोनाने संपूर्ण मुंबईत हाहाकार माजला असताना उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे एक वेळा सुद्धा उपनगरांत फिरकले नाहीत, तसेच मागील ८ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक सुद्धा घेतली नाही, त्यामुळे अगोदर कोरोना आणि आता बेसुमार पावसामुळे मुंबईकरांचे बेहाल होत असताना ठाकरे सरकार मात्र मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून ताज बरोबर पर्यटनाचे करार करण्यात मग्न आहे, अशी टीका देखील आमदार भातखळकर यांनी केलीे.

 तसेच, पोईसर नदी रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या हनुमान नगर व पोईसर येथील कुटुंबाना झो.पु.प्रा. च्या ताब्यातील मालाड पूर्व आप्पापाडा येथील घरे देण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता, परंतू आता तो निर्णय बदलून ती घरे माहुल येथील लोकांना देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मुळात पोईसर नदीच्या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या पोईसर व हनुमान नगर येथील कुटुंबांना, तसेच उत्तर मुंबई परिसरातील बाधितांना ही घरे प्राधान्यक्रमाने मिळणे आवश्यक आहे. ते राहात असलेल्या परिसरातच त्यांना घरे मिळाली तर पोईसर नदी रुंदीकरण प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गातील प्रमुख अडसर दूर होऊन, प्रकल्प झपाट्याने पूर्ण होतील. परंतू तसे न करता या सर्व लोकांना चेंबूर येथे जाण्यास सांगितले जात आहे. याउलट चेंबूरच्या जवळ असलेल्या माहुल येथील लोकांना मालाड येथे आणण्यात येत आहे, त्यामुळे हा निर्णय अत्यंत चूक व अव्यवहारीक आहे. त्यामुळे अगोदरच्या सरकारने घेतलेला निर्णय बदलून हनुमान नगर व पोईसर येथे राहणाऱ्या लोकांवर अन्याय करण्याचे काम सुद्धा ठाकरे सरकार करीत असून त्यांनी घेतलेला निर्णय रद्द न केल्यास त्या विरोधात पुन्हा मोठे आंदोलन करणार असल्याचे सुद्धा आमदार भातखळकर म्हणाले.

या वेळी मुंबई महानगरपालिकेचे मजा नगरसेवक शिवकुमार झा, नगरसेविका सुनिता यादव, नगरसेविका सुरेखा पाटील, उत्तर मुंबई भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शिंदे यांच्यासह हनुमान नगर, पोईसर  व कांदिवली विधानसभा मतदारसंघातील शेकडो रहिवाशी उपस्थित होते.

टॅग्स :भाजपाअतुल भातखळकरआदित्य ठाकरे