Join us

गणेशघाट तलावाची दुरवस्था

By admin | Updated: December 7, 2015 01:31 IST

मुलुंड पूर्वेकडील गणेश घाट तलावाच्या स्वच्छतेकडे गेल्या काही दिवसांपासून पालिका दुर्लक्ष करीत आहे. आता तलावाला कोरड पडली असून

मुंबई : मुलुंड पूर्वेकडील गणेश घाट तलावाच्या स्वच्छतेकडे गेल्या काही दिवसांपासून पालिका दुर्लक्ष करीत आहे. आता तलावाला कोरड पडली असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, दारूच्या बाटल्यांच्या खच पडलेला पाहावयास मिळत आहे. पालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनदेखील या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया मुलुंडकरांमध्ये उमटत आहे. मुलुंड पूर्व, मिठागर रोड येथे असलेला ‘गणेश घाट’ हा तलाव स्थानिकांच्या मागणीखातर मूर्ती विसर्जनासाठी पाच वर्षांपूर्वी मिठागर रोड परिसरात तयार करण्यात आला, पण गेल्या काही दिवसांपासून या तलावाच्या स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. या विसर्जन तलावाची साफसफाई व्यवस्थित न केल्याने हा तलाव अस्वच्छ झालेला आहे. पालिकेचे कर्मचारी येतात आणि वारंवार साफसफाई करतात आणि निघून जातात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या तलावात विसर्जित मूर्तींचे अवशेषही तशाच अवस्थेत आहेत, तसेच सध्या या तलावातील पाणी आटल्यामुळे दारूच्या बाटल्यांचा खच आणि कचऱ्याचे साम्राज्य दिसते आहे. या तलाव परिसरात जॉगिंग ट्रॅक असून, ज्येष्ठ नागरिक व तरुण या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी येतात. देवीदेवतांच्या मूर्तींची ही अवस्था म्हणजे विटंबना आहे. या संदर्भात पालिकेकडे मिताई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी स्थानिकांच्या मदतीने पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण पदरी निराशा आल्यामुळे येथील नागरिक संतप्त आहेत. पालिकेने तलावाची स्वच्छता न केल्यास स्वत: साफसफाई करू, असा इशारा दिला आहे.