कुडूस : वाडा तालुक्यातील चिंचघर तसेच कुडुस या दोन्ही ग्रामपंचायतींना स्मशानभूमीच नसल्याने नागरीक संतप्त आहेत. चिंचघर येथे मृताच्या अंत्यविधीसाठी सोमवारी जमलेल्या नागरिकांनी अखेर संतापून ग्रामपंचायतीच्या कार्यालयाची जागा निवडल्याने स्मशानभूमीचे बांधकाम त्वरेने करण्याचे आश्वासन मिळाले.चिंचघर येथील विठ्ठल नगर मधील रहिवासी मंगेश हरी पवार यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. स्वत:ची जागा नसल्याने त्यांनी अन्य जागेचा अंत्यविधीसाठी शोध घेतला. मात्र खाजगी जागेत विरोध होत असल्याने पवार यांच्या नातेवाईकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यविधीची तयारी करताच ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांचे धाबे दणाणले. त्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे स्मशानभूमीसाठी राखीव जागेत स्मशानभूमी शेडचे बांधकाम उद्यापासून सुरू करण्याचे आश्वासन दिले. या नंतर पवार यांच्या अंत्यविधीसाठी गावाबाहेरची जागा निवडली. जून महिना अखेरीपर्यंत स्मशानभूमी शेडचे बांधकाम झाले नाही तर या पुढील अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच करण्यात येतील असा इशारा चिंचघर ग्रामस्थांनी दिला आहे.तालुक्यातील चिंचघर ही प्रतिष्ठीत ग्रामपंचायत आहे. या गावात जि. प. सदस्य, पंचायत समिती उपसभापती, विद्यमान पंचायत समिती सदस्य असूनही गावकऱ्यांना उघड्यावर अंत्यविधी करावा लागतो. प्रसंगी जागेसाठी अडवणूक झाल्यास परप्रांतीयांना वनखात्याच्या जमीनीत अंत्यविधीसाठी मृतदेह न्यावा लागतो. पावसाळ्यात तर याचा मोठा त्रास होतो. स्मशानभूमीसारखी महत्त्वाची गरजही प्रशासनाकडून पूर्ण होत नसल्याने गावकऱ्यांत नाराजी आहे.
चिंचघर येथे उघड्यावरच अंत्यविधी
By admin | Updated: June 23, 2015 00:57 IST