Join us

‘मराठी भवन’साठी निधी जमला, पण जागेचे काय?

By admin | Updated: August 5, 2014 00:13 IST

राज्य सरकारनेच पुढाकार घ्यावा : किमान एक एकर शासकीय जमीन उपलब्ध करून देणे गरजेचे

कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवक वर्गाच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करावयाच्या नियोजित ‘मराठा स्वराज्य भवन’ला रविवारी झालेल्या मराठा समाजाच्या अधिवेशनात ३६ लाखांच्या निधीची घोषणा झाली खरी, पण त्यासाठी लागणाऱ्या जागेची अडचण मात्र कायम राहिली. राज्य सरकारने पुढाकार घेऊन एक एकर शासकीय जमीन उपलब्ध करून दिली तरच ‘मराठा स्वराज्य भवन’ उभारण्याचा मार्ग सुकर होईल, म्हणूनच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनीच यात लक्ष घालावे, अशी मागणी पुढे आली आहे. भवन उभारण्याकरिता समाजात निधी गोळा करण्याचा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही; परंतु जागेची प्रमुख अडचण आहे. त्यामुळेच यापूर्वी ‘मराठा भवन’ उभारण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. शहरात एकाच ठिकाणी दहा ते वीस हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध होईल, असा एकही भूखंड सध्या नाही आणि असलाच तर तो कोल्हापूर महानगरपालिका देईल का, हाही एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जागा उपलब्ध झाली तरच हा मराठा भवनाचा उपक्रम प्रत्यक्षात साकारला जाणार आहे. जागा हाच यातील महत्त्वाचा भाग असल्याने सरकारने मनावर घेणे अधिक महत्त्वाचे आहे.कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्मारक भवनच्या धर्तीवर मराठा स्वराज्य भवन उभारण्याचा मानस मराठा महासंघाचा आहे. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी मराठा स्वराज्य भवन ट्रस्टची स्थापनाही झाली आहे. खरी अडचण जागेची असल्याने ट्रस्ट स्थापन केल्यानंतरही काम धिम्या गतीने सुरू आहे; परंतु काल, रविवारी झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात स्थानिक नेते वसंतराव मुळीक यांनी कोल्हापुरात मराठा भवन उभारण्यात येणार असल्याचे सांगताच याच कार्यक्रमात व्यासपीठावरून ३६ लाखांचा निधीही जाहीर झाला. त्यामुळे या उपक्रमाला एकप्रकारे गती मिळाली आहे. परंतु, जागेची अडचण सोडविण्याची ग्वाही कोणी दिली नाही, त्यामुळे निधी गोळा झाला तरी जागाच नसेल तर भवन उभारणार कसे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह सर्वांनीच हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी स्थापन केलेल्या मराठा भवन ट्रस्टचे काही निश्चित धोरण तसेच कार्यप्रणाली ठरविलेली आहे. योग्य मार्गदर्शनाअभावी तसेच नोकरी, व्यवसायापासून दूर फेकल्या गेलेल्या मराठा समाजातील युवकांना व विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी परीक्षांबाबत तसेच उद्योग व्यवसायासंबंधी मार्गदर्शन आणि सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्यासाठी भवनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे प्रमुख उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. महाविद्यालयीन मुलांसाठी एक स्वतंत्र वसतिगृहसुद्धा उभारण्याचा प्रयत्न राहणार आहे; परंतु हे प्रत्यक्षात साकारण्यासाठी जागेचीच आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)--छत्रपती शाहू स्मारक भवनच्या धर्तीवर ‘मराठा स्वराज्य भवन’ उभारण्याचा मानस -भवन उभारण्याकरिता समाजात निधी गोळा करण्याचा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही; परंतु जागेची प्रमुख अडचण-जागेअभावीच यापूर्वी ‘मराठा भवन’ उभारण्याचे प्रयत्न अयशस्वी झालेत -मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह सर्वांनीच प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज