Join us

अडीच एफएसआयची अंमलबजावणी

By admin | Updated: November 19, 2015 00:30 IST

मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शासनाने अडीच एफएसआयचे धोरण मंजूर केल्यानंतर पहिली बांधकाम परवानगी वाशीतील

- नामदेव मोरे,  नवी मुंबईमोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शासनाने अडीच एफएसआयचे धोरण मंजूर केल्यानंतर पहिली बांधकाम परवानगी वाशीतील आकाश सहकारी गृहनिर्माण सोसायटीला दिली आहे. यामुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या १२ हजार कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईमध्ये सिडकोने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी,सानपाडा व नेरूळमध्ये बांधलेल्या अनेक इमारती धोकादायक झाल्या आहेत. या इमारतींमधील १२ हजार सदनिकाधारक मृत्यूच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. जुन्या इमारतींची पुनर्बांधणी करण्यास वाढीव एफएसआय मिळावा अशी मागणी १५ वर्षांपासून नागरिक करत होते. फेब्रुवारीमध्ये शासनाने अडीच एफएसआयला परवानगी दिली आहे. यानंतर पुनर्विकास प्रकल्पांना मंजुरी मिळावी यासाठी अनेक प्रस्ताव महापालिकेकडे सादर झाले आहेत. वाशी सेक्टर १० मधील आकाश गृहनिर्माण सोसायटीनेही शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे बांधकाम परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला होता. अडीच एफएसआयसाठी महापालिका, सिडको व शासनाकडे १५ वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या नगरसेवक किशोर पाटकर यांनी या प्रस्तावास परवानगी मागितली होेती. महापालिका प्रशासनाने अडीच एफएसआयच्या धोरणाप्रमाणे या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. शहरातील ही पहिलीच बांधकाम परवानगी असल्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता शहरातील जुन्या इमारतींची पुनर्बांधणी वाढीव एफएसआयप्रमाणे लवकर होईल असा विश्वास नागरिकांना वाटू लागला आहे. महापालिकेने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशीतील जेएन १ व २ इमारती, सानपाडा, नेरूळमधील सिडकोने बांधलेल्या अनेक इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. वाशीतील श्रद्धा गृहनिर्माण सोसायटीमधील रहिवासी कित्येक वर्षांपासून ट्रांझिस्ट कँपमध्ये रहात आहेत. धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत घेवून नागरिकांना नाईलाजाने राहावे लागत आहे. या सर्वांना आता दिलासा मिळाला आहे. अडीच एफएसआयचा फायदा शहरातील १२ हजार सदनिकाधारकांना मिळणार आहे. याशिवाय नागरिकांसाठी हजारो नवीन घरे उपलब्ध होणार आहेत. महापालिकेला विकास शुल्क, मालमत्त्ता करातून करोडो रुपयांचा महसूल मिळणार आहे. गत १५ वर्षांपासून धोकादायक इमारतींसाठी अडीच एफएसआय मिळणार असल्याच्या घोषणा केल्या जात होत्या. परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नव्हती. पालिकेने पहिल्या प्रकल्पाच्या बांधकामाला परवानगी दिल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुनर्बांधणीमुळे रहिवाशांवरील अपघाताचे संकट दूर होणार असल्यामुळे पुनर्बांधणीस सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. विकासात राजकारण नकोशहरातील १२ हजार कुटुंबातील ५० हजारपेक्षा जास्त नागरिक धोकादायक इमारतींमध्ये राहात आहेत. एखादी इमारत कोसळली तर हजारो नागरिकांना जीव गमवावा लागेल. यामुळे पुनर्बांधणीच्या विषयाचे कोणी राजकारण करू नये. मध्यंतरी काही जण ३३ टक्के वाटा मागत असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली होती. प्रकल्प रखडविण्यासाठी व काम बंद पाडण्यासाठीही प्रयत्न होत असून शहरवासीयांच्या हितासाठी असे प्रकार होवू नयेत, असे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे नागरिकांनी आभार मानले आहेत. आकाश गृहनिर्माण सोसायटीमध्ये मेडिकलचे दुकान होते. परंतु इमारत धोकादायक झाल्यामुळे व्यवसाय बंद करावा लागला. इमारतीचे बांधकाम यापूर्वीच सुरू झाले आहे. परंतु काही जणांनी त्यामध्ये अडथळे निर्माण केले. नगरसेवक किशोर पाटकर यांनी पाठपुरावा करून बांधकाम मंजुरी मिळविली आहे. रहिवासी त्यांचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंसह सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभारी आहोत. - आश्रफ कापडी, सचिव, आकाश गृहनिर्माण सोसायटीपुनर्बांधणीचा विषय मार्गी लागावा यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. युती शासनाने सत्तेवर येताच तत्काळ अडीच एफएसआयचा प्रश्न मार्गी लावला. नवीन धोरणाप्रमाणे वाशीत पहिली बांधकाम परवानगी मिळाली आहे. धोकादायक इमारतीमधील रहिवाशांनी दाखविलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. शहरातील सर्व धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या १२ हजार कुटुंबांनाही दिलासा मिळाला आहे. - किशोर पाटकर, नगरसेवक, प्रभाग ६१