Join us

परदेशी शिष्टमंडळात भेटला बालमित्र  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 05:37 IST

एक परदेशी शिष्टमंडळ भेटायला यावे आणि त्यातील एक चक्क आपला वर्गमित्र असावा, असा सुखद अनुभव मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांना बुधवारी आला.

मुंबई : एक परदेशी शिष्टमंडळ भेटायला यावे आणि त्यातील एक चक्क आपला वर्गमित्र असावा, असा सुखद अनुभव मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांना बुधवारी आला.बांगलादेश मधील माध्यम प्रतिनिधींचे शिष्टमंडळ भारताच्या भेटीवर आले आहे. हे शिष्टमंडळ मुख्य सचिवांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले. समिती कक्षात स्वागत आणि ओळख परिचयाचा औपचारिक कार्यक्रम झाला. त्यांनतर मुख्य सचिवांनी शिष्टमंडळाचे स्वागत करीत मुंबई देशाची आर्थिक राजधानी, विकसित महाराष्ट्र, बॉलिवूड आदी संदर्भात विवेचन केले. शिष्टमंडळातील सदस्यांनीही मुंबईशी निगडित आठवणी, बांगलादेशवासीयांमध्ये मुंबई, बॉलीवूडविषयी असलेलं आकर्षण याविषयी अनुभव कथन केले.चर्चा सुरु असताना शिष्टमंडळातील अल्तमास कबीर हे सदस्य आपल्या जागेवरून उठले आणि मुख्य सचिवांकडे गेले आणि आपण एका शाळेतच नव्हे तर एकाच वर्गात होतो याची आठवण त्यांनी जैन यांना करून दिली. मुख्य सचिवांनाही तो सुखद धक्का होता आणि उपस्थितांनाही... कबीर हे सध्या बांगला देशातील दै.संगबादचे संपादक आहेत.त्याच क्षणी १९७१ ते १९७६ चा काळ मुख्य सचिवांच्या डोळ्यासमोर तरळला... अजमेर राजस्थान येथील मेयो माध्यमिक विद्यालयात जैन व कबीर हे इयत्ता सहावी ते अकरावी पर्यंत एकाच वर्गात शिकले. दोघांनी आठवणींना उजाळा दिला. वर्गात सोबत कोण होते त्यातील काहींची नावे घेतली आणि तो काळ पुन्हा आठवला..आश्चर्य मिश्रित आनंदाचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. कबीर यांनी आपल्या बालपणीच्या वर्गमित्राला बांगलादेशला नक्की यायचे निमंत्रण दिले. या घटनेनंतर क्षणात बैठकीचा औपचारीकपणाचा माहोल बदलला.

टॅग्स :सरकारबातम्या