मुंबई: गोरेगाव पश्चिम हायवेवर बुधवारी सकाळी झायलो गाडीने दिलेल्या धडकेत एका जोडप्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी झायलो चालकाला अटक केली आहे. पहाटे या ठिकाणी सर्वत्र पसरलेल्या धुक्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. हरेंद्र राजपुरा (६२) आणि त्यांची पत्नी भावना (४७) हे मूळ गुजरातच्या सूरत शहरातील रहिवाशी आहेत. दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास ते व्होल्वो गाडीतून गोरेगाव महामार्गावर उतरले. त्यानंतर सामान घेऊन ते पायीच मालाड पूर्व येथे राहणाऱ्या त्यांचा मेव्हणा रितेश कुकडिया (३३) यांच्या घरी जाण्यासाठी निघाले. ते वीरवाणी बस थांब्याजवळ पोहोचणार, इतक्यात एका भरधाव वेगात आलेल्या झायलो गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या भावना यांचा जागीच मृत्यू झाला, तर हरेंद्र यांची संजीवनीमध्ये उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. (प्रतिनिधी)
धुक्यामुळे दोघांचा बळी
By admin | Updated: December 25, 2015 03:26 IST