मुंबई : कायम वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडलेला पश्चिम उपनगरांचा जोडरस्त्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे़ पालिका प्रशासनाने त्या दिशेने पावले उचलली असून, वाहतूककोंडी होणाऱ्या पाच महत्त्वाच्या रस्त्यांवर उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव आला आहे़ या प्रकल्पाची किंमत अंदाजे ३०० कोटी रुपये असणार आहे़ यामुळे अंधेरी ते बोरीवली या पट्ट्यातील वाहतूक सुकर होणार आहे़प्राथमिक स्तरावर या प्रकल्पाची तूर्तास चाचपणी सुरू आहे़ या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी पालिकेच्या पूल खात्याने तीन एजन्सी नियुक्त केल्या आहेत़ त्याचबरोबर येथील वाहतुकीचा अभ्यासही करण्यात येणार आहे़ या एजन्सींचा अहवाल सकारात्मक आल्यास बोरीवली डॉन बॉस्को, एम़जी़ मार्गाजवळ, मालाड येथील मीठ चौकी, चिंचोळी बंदर आणि बांगूरनगर अशा पाच ठिकाणी पुलांचे काम सुरू होईल़त्यानुसार डॉन बॉस्को शाळेजवळील ३ कि़मी़ पुलासाठी ३२ कोटी, एम़जी़ मार्गाजवळील १़२ कि़मी़ पुलासाठी ५५ कोटी, मीठ चौकी येथील १़८ कि़मी़ पुलासाठी ७१ कोटी, चिंचोळी बंदर येथील १़८ कि़मी़साठी ३६ कोटी आणि बांगूरनगर येथे ६ कि़मी़ लांब पुलासाठी ४२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे़ या उड्डाणपुलांचे काम पूर्ण होण्यास अंदाजे दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)
पश्चिम उपनगरांत पाच पूल
By admin | Updated: October 6, 2014 12:05 IST