ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.26- मद्यधुंद अवस्थेतील 5 तरूणांना दहशतवादी असल्याची बतावणी करणं चांगलंच अंगलट आलं. ठाणे पोलिसांनी या पाचही जणांना नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याच्या आरोपाखाली अटक केलं आहे. मुंबईच्या भांडूपमध्ये ही घटना घडली. टॅक्सी चालकाला घाबरवण्यासाठी या पाच जणांनी दहशतवादी असल्याची खोटी बतावणी केली. चालकाला घाबरवून त्याला भाडं न देण्याची त्यांची योजना होती.
जितू झा(30), प्रदीप पिसळ(39), सय्यद शैकाल्कल(35), नागेंद्र यादव(25) अखिलेश ओझा(29) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 'मुंबई मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री ठाण्याच्या सरकारी रूग्णालयात जाण्यासाठी या 5 जणांनी संदिप सकपाळ याची टॅक्सी बूक केली. 'पाचही तरूण खूप जास्त नशेत होते, त्यामुळे मी त्यांना घेऊन जायला तयार नव्हतो. मुलुंडवरून दुसरी टॅक्सी पकडू असं त्यांनी सांगितल्यावर मी त्यांना घेऊन जायला तयार झालो' असं सकपाळने सांगितलं.
'टॅक्सीमध्ये बसल्यानंतर बॉम्बब्लास्ट कुठे करायचा याबाबत ते तरूण जोरजोरात चर्चा करायला लागले. उरणची रेकी करून झाली आहे आता मुंबई आणि ठाण्यात ब्लास्ट करण्यासाठी योग्य ठिकाणाचा शोध घ्यायचा आहे' असं ते आपआपसात बोलत होते. 'मला माहित होतं ते खोटं बोलत आहेत, कारण दहशतवादी इतक्या जोरात बोलणार नाहीत. मात्र, टॅक्सीतून उतरल्यावर, उरणमध्ये काय झालं माहित आहे ना? असं सांगत त्यांनी पैसे द्यायला नकार दिला'. त्यामुळे यांना धडा शिकवायचा असं मी ठरवलं व पोलीस स्थानकात जाऊन तक्रार केली. अशी माहिती सकपाळने दिली.
त्यानंतर त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी रात्री 3 वाजता पाचही जणांना अटक केली.