मुंबई : दोन वर्षे रखडलेली उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन यांची बढती त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांआधी पालिका महासभेत घाईघाईने मंजूर करण्यात आली होती़ काळबादेवी येथील दुर्घटनेनंतर बढतीचा प्रस्ताव मंजूर करण्याची घाई करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने मात्र सोमवारी पुन्हा तीन उपप्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांच्या बढतीचे प्रस्ताव राखून महापौर स्रेहल आंबेकर यांनी आपला मनमानी कारभार दाखवून दिला़अमीन यांच्या बढतीचा प्रस्ताव १ नोव्हेंबर २०१३ पासून रखडला होता़ पालिकेच्या महासभेत हा प्रस्ताव वर्षभर रेंगाळला होता़ या विलंबामुळे रोष ओढावू नये, यासाठी शिवसेनेने तातडीने अमीन यांच्या बढतीचा प्रस्ताव पालिकेच्या महासभेत मंजूर केला होता़ मात्र या घटनेनंतरही सत्ताधाऱ्यांना शहाणपण सुचलेले दिसत नाही़ याची प्रचिती सोमवरच्या पालिका महासभेतून आली़ काळबादेवी येथील आगीच्या दुर्घटनेत चार वरिष्ठ अग्निशमन अधिकारी शहीद झाले़ तसेच एक उपप्रमुख अधिकाऱ्यांच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत़ या तीन जागांवर विजयकुमार पाणिग्रही, यशवंत जाधव आणि श्याम खरबडे यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत मंजूर होऊन महासभेपुढे तातडीचे कामकाज म्हणून सादर झाले होते़ मात्र महापौरांनी हे तातडीचे कामकाजही राखून ठेवले़ (प्रतिनिधी)
अग्निशमन अधिकाऱ्यांच्या बढतीचे प्रस्ताव रखडले
By admin | Updated: July 1, 2015 01:07 IST